ज्ञानेश्वर रायते, बारामती.
गेल्या काही दिवसांपासून जादूगारासारखी मन वाचण्याची कला शिकून माणसांच्या मनातील गोष्टी ओळखण्याचा चमत्कार करतो, म्हणून जे अंधभक्त ज्याच्या पायावर लोळण घेत आहेत आणि जे चाटूगीर पत्रकारही त्याचा जयजयकार करीत आहेत, तो शास्त्री आज जगद्गुरू तुकोबारायांच्या बाबतीत बरळला..
खरंतर मंबाजी भटासारखे असले पादरे पावटे बहुजन समाजाची टेस्टिंग करीत आहेत. काही वादग्रस्त बोलून यांच्या भावना भडकतात का? हे पाहण्याची त्यांची बहुधा टेस्टींग सुरू असावी किंवा या शास्त्रीला देखील ४० पैसेवाल्या आयटी सेलचीच स्क्रिप्ट असावी.
शास्त्रीसारख्या पावसाळ्यात उगवणाऱ्या भूछत्रीसारख्या कथित धार्मिक बाबाने संपूर्ण जगाचे उध्दारक असलेल्या, विद्रोही विचाराने संपूर्ण समाजाला वठणीवर आणणाऱ्या जगदगुरू संत तुकोबारायांबाबत अभद्र वाक्ये वापरली. या शास्त्रीचं वय काय? बोलतोय काय? तो जर धार्मिक बाबा आहे, तर त्याने माहिती नसलेले संदर्भ एका संतांबाबत का वापरावेत? आम्ही तुकोबारायांना डोक्यावर आणि डोक्यात घेऊन मिरवतो. तुकोबाराय काय माहिती आहेत, त्याला?
त्याने तुकाराम महाराजांना त्यांची बायको दररोज मारायची असे वक्तव्य केले आहे. जेव्हा तुकोबारायांना विचारले, तेव्हा त्यात काय विशेष? जर प्रेम करणारी बायको असती, तर देवावर माझे प्रेमच जडले नसते अशी मुक्ताफळे उधळली आहेत. खरंतर तो काय बरळला, हे आता सांगायला नको, मात्र तो नेमके काय गरळ ओकला हे सांगण्याची आवश्यकता होती, त्याशिवाय त्याचा समाचार घेता येणे शक्य नाही.
एक गोष्ट इथे फार महत्वाची आहे. हा पोरसवदा युवा धार्मिक प्रवचनकार तो राहत नसलेल्या महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या बहुजनांच्या महापुरूषाविषयी, संतांविषयी अतर्क्य किंवा चीड आणणाऱ्या गोष्टी करतो, तेव्हा साहजिकच एक शंका येते, ती म्हणजे त्याचा बोलवता धनी कोण आहे? कारण त्या जेम्स लेनला देखील भारतात येण्यापूर्वी शिवाजी महाराज किंवा इथला इतिहास नक्कीच माहीत नव्हता. म्हणजे महाराष्ट्रातल्या कोणत्याच पुस्तकात, बखरीत, धार्मिक कथेत जे लिहिलं नाही, जे अस्तित्वात नाही, ते मध्य प्रदेशातल्या एका बाबाला कुठून माहित झाले?
शास्त्रीला ही स्क्रीप्टच दिली असावी अशी दाट शंका येण्यामागे त्याने दोन – चार दिवसांत जे चमत्कार केले आणि त्या चमत्कारांना सुहानी शहा नावाच्या युवा जादूगाराने जो रितसर आरसा दाखवला, त्यावरून लोकांचे लक्ष वळविण्यासाठी आणि महाराष्ट्रात या बाबाला प्रसिध्द करण्यासाठी ही पध्दतशीर चाल असावी, नाहीतर महाविकास आघाडीच्या काळात प्रसिध्द झालेली कंगणा राणावत सारखी कोण्या चित्रपटात काम करणारी नटी तरी त्याआधी गाव, वाड्यावस्त्यांवर कुठे कोणाला माहिती होती?
एखाद्याला प्रसिध्द करायचे असेल, तर वादग्रस्त वक्तव्यांशिवाय प्रसिध्दच होत नाही. ही आजच्या काळाची खंत आहे आणि त्याला कारणीभूत आहेत, सकारात्मक ऐवजी नकारात्मक टिप्पण्यांना महत्व देणारी माध्यमे.. त्यात तो शास्त्रीच्या पायावर लोळण घेणारा पत्रकार पाहिला, की माध्यमे कोणत्या थराला निघाली आहेत याचा प्रत्यय येतोच.
हा बाबा, जर एवढा चमत्कारी आहे, तर जो जोशीमठ सध्या खाली घरंगळत चालला आहे, तो वाचविण्यासाठी त्याला देवभूमीत पाठवा. तो देवभूमीत गेलाच होता, तर हे पवित्र काम त्याने करायला हवे होते. किंवा त्याला चीनचा, पाकिस्तानचा बंदोबस्त करायला पाठवला पाहिजे.
अर्थात त्याच्या दरबारात अजूनपर्यंत जोशीमठाची, चीनची अर्जी किंवा पर्ची का निघाली नाही? स्वतःच जर तो पर्ची काढत असेल, तर डोळस भक्तांनी देखील त्याला विनंती केली पाहिजे की, आमच्या चिठ्ठ्या काढण्याऐवजी चीन, पाकिस्तानची चिठ्ठी काढावी.
जोपर्यंत अशी सामूहिक हिताची पर्ची किंवा अर्जी दरबारात निघत नाही, तोवर शास्त्रीनं त्याचा तो पादरा पावट्याचा चमत्कार स्वतःजवळच ठेवावा. महाराष्ट्र अशा गोष्टींना भुलत नाही. दोन दिवसांत खऱ्याचे येथे खरे होते आणि खोट्याचे खोटे..! आणि हो, बहुजनांच्या आदरस्थानांबाबत आदब राखूनच बोलायचे..