विक्रम शिवाजीराव जगताप व घनश्याम केळकर
महान्यूज लाईव्ह । बुधवार ११ जानेवारी २०२३
वेळ दुपारी ३.०० वा.
शिवकाळापासून पणदऱ्यात दिमाखात उभ्या असलेल्या बुरुंजबाबांच्या वाड्याचा इतिहास आपण जाणून घेतला. आजच्या या भागात आपण भेटणार आहोत अशा एका व्यक्तीला, ज्यांनी वयाच्या पाचव्या वर्षी वडिल वारल्यानंतर या वाड्याचा भार एकहाती आपल्या डोक्यावर घेतला. काळ्या मातीत घाम गाळणारा एक खराखुरा शेतकरी कसा असतो याचा आदर्श घालून देणारे धनसिंगआप्पा जगताप यांना
शेती फायद्याची नाही असे सांगणारे लाखो शेतकरी तज्ञ तुम्हाला प्रत्येक गावात भेटतील. पण यातील बहुतेकांच्या पायाची धुळ त्यांच्या शेताला फार क्वचितच लागते. बांधावर बसूनच हे गप्पा मारत असतात. अशाना अपवाद असतात ते पणदऱ्याच्या धनसिंगआप्पांसारखे मातीशी इमान राखलेले सच्चे शेतकरी.
खरे तर आप्पा सरदार घराण्यातले. अशा घरात गादीवर बसून हुकूम सोडण्याची पिढ्यानपिढ्यांची सवय असते. पण आप्पांचा तो स्वभावच नाही. वयाच्या पाचव्या वर्षी वडिल वारले. हे एकुलते एक. जसे कळू लागले तसे घरच्या कारभाराचे ओझे खांद्यावर पडले. पण आप्पांना ते कधी ओझे वाटले नाही. कारण त्यांचे मन काळ्या आईच्या सेवेत आणि गुराढोरांच्या सहवासातच रमत होते.
जोपर्यंत वय लहान होते, तोपर्यंत घरच्यांनी शेती अर्धेलीने कसायला दिली होते. वयाच्या सतरा अठराव्या वर्षी आप्पांनी ही १७ एकराची शेती स्वत: कसायला सुरुवात केली. त्यांच्या हाती आलेल्या जमिनीत दहा एकर विहीर बागायत होती. त्यानंतर त्यांनी शेतीत पुर्ण लक्ष घातले. पै पै वाचवून जशी संधी मिळेल तशी शेती वाढवली. जिरायती जमिनी घेतल्या. त्या विहीताखाली आणण्यासाठी, त्या जमिनीत पाणी आणण्यासाठी विहीरी पाडल्या. पाईपलाईन केल्या. यातून आजचे हे वैभव उभे राहिले आहे. आज त्यांचे ८७ वय आहे. पण आजही त्यांचे शेतीकडे पुर्ण लक्ष आहे.
मोटा, डिझेल इंजिन, इलेक्ट्रीक मोटार, पाण्यातील सबमर्सिबल मोटार या सगळा शेतीव्यवसायाचा प्रवास आप्पांनी पाहिला आहे. यातमध्ये ही मशिनरी त्यांनी केवळ चालवलेली नाही तर त्यांनी त्यातले सर्व ज्ञान आत्मसात केले आहे. सुरुवातीला त्यांनी चामड्याच्या साडेसात पौंडाच्या मोटा जशा चालवल्या आहेत तशा त्यांनी त्यानंतर डिझेल इंजिनही खोलून दुरुस्त केले आहे. पुर्वीच्या काळच्या पाण्यावरच्या मोटारीही त्यांनी दुरुस्त केल्या आहेत. त्यानंतर वीजेवरच्या पाणबुड्या मोटारी आल्या, पण त्यातीलही खाचाखोचा त्यांनी आत्मसात केल्या.
ज्यावेळी शेतात विहीर काढण्याचे ठरले त्यावेळी आप्पांनी एक वेगळेच इंजिनिअरींग राबवले. त्यांनी बैलाच्या साह्याने फरांडी तयार केली. त्यातून दहा फुटाचा खड्डा त्यांनी करून घेतला. ही गोष्ट आहे १९७५ सालातील. विहीर खोदणे त्यावेळी आजच्याऐवढे सहजसोपे नव्हते. त्यासाठीच्या मशिनरी उपलब्ध नव्हत्या. त्यावेळी त्यांनी हे डोके वापरून विहिर खोदाईसाठीचा खर्च वाचवला.
शेतीचे सगळे गणीत असते बाजारभावावर. या बाजारावर लक्ष दिले तरच शेती फायद्यात जाऊ शकते हे आजही शेतकऱ्याला समजावून सांगावे लागते. पण १९६० – ७० च्या काळात आप्पांनी ही बाब समजून घेतली होती. लोणंदच्या व्यापाऱ्याकडे येणाऱ्या बाजारभावाच्या तारा पाहून त्यांनी शेतीमालाच्या बाजारभावाचे गणीत समजून घेतले. त्यानंतर हे व्यापारी कुठे माल पाठवतात याचीही माहिती घेतली, त्यानंतर त्यांनी आपला माल पुणे, मुंबई, हैद्राबाद, बंगलोरच्या बाजारात स्वत: जाऊन विकला आहे. याच काळात आप्पा कांदा विकण्यासाठी पार बंगलोर,हैद्राबादपर्यंत चार चार ट्रक घेऊन जात होते. त्यानंतर तेथील व्यापाऱ्यांच्या ओळखी काढून त्यांनी तेथपर्यंत माल पोचविला.
बागायती पट्टा हा आळशी शेतकऱ्यांचा पट्टा म्हणून ओळखला जातो. शेतीला पाण्याची व्यवस्था झाली की ऊस लावून टाकायचा आणि निवांत व्हायचे हे बहुतेक शेतकऱ्यांचे गणीत असते. पण आप्पांनी मात्र १९६२ साली त्यांनी द्राक्षाची बाग केली होती. डाळींब, द्राक्ष, गाजर, मिरची, भेंडी, दोडका यासारख्या वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग करुन पाहण्याची त्यांची हौस दांडगी आहे. पण हा केवळ हौसेचा मामला नाही. पुर्ण गणीत मांडून, बाजारपेठेचा अंदाज घेऊनच यात उतरायचे हा त्यांचा नियम आहे. कोणते पिक केव्हा करायचे, त्याला कोणत्या काळात बाजार मिळेल याचा त्यांना बरोबर अंदाज लागतो. अर्थातच मागेही वर्षोनूवर्षे जमिनीवर उतरून केलेला अभ्यास आहे. दोन वर्षापूर्वी २०२० साली त्यांनी दहा एकरावर दोडका केला होता. यातून त्यांना दोनशे टन माल मिळाला. स्वतःच्या मेहनतीवर व मार्केटचा व्यवस्थित अभ्यास करून ५५ लाखांचे उत्पन्न या कुटुंबाने दोडक्याच्या प्लॉटमधून मिळवले. यांचा १० एकरातील दोडक्याचा प्लॉट हा त्यावेळचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा दोडक्याचा प्लॉट असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. आजही शेतात साडेपाच एकरात काकडी व वांग्याचा प्लॉट असून हे कुटुंब शेतीत सतत नवनवीन प्रयोग करत असते. तरकारी करत असताना पाठीमागे मेहनतीला एकीचे बळ व अभ्यासाची जोड असेल तर शेती व कृषि पूरक उद्योग हा नफ्याचा धंदा असल्याचे या कुटुंबाकडे पाहिल्यावर समजते.
हाती १७ एकर घेऊन सुरुवात केलेल्या आप्पांच्या हाती आज स्वत:ची ७० एकर जमिन आहेच. आणखी ते ३३ एकर जमिन खंडाने करत आहेत. हा चमत्कार कसा झाला याचा अंदाज त्यांनी केलेल्या एका व्यवहारातून येतो. या व्यवहारात त्यांनी रस्त्याकडेची पाच एकर काळी सुपीक जमिन देऊन साडे अकरा एकराची मुरमाड जमिन घेतली. त्यानंतर ही जमीनही विहीत केली. तिची बांधबंदिस्ती करून पाण्याची व्यवस्था केली.
खरा शेतकरी कसा असतो यासाठी धनसिंगआप्पा एक उदाहरण आहे. त्यांनी १९८५ साली एक जावा मोटारसायकल घेतली. त्यावेळी दोन चार दिवस या बुलेटवरून फिरण्यातच गेले. तेवढा काळ शेताकडे दुर्लक्ष झाले. आप्पांच्या लक्षात आले की या बुलेटच्या नादात आपले शेताकडे लक्ष कमी होत आहे, त्यामुळे एका महिन्यातच नुकसान सोसून त्यांनी ती गाडी तातडीने विकून टाकली आणि पु्न्हा शेताकडे वळाले. त्यांचे सगळे फिरणे सायकलवर. सायकलवरून पंढरपूर, शिंगणापूर, जेजुरी, वाल्हे येथेपर्यंत ते जात असत. बारामतीला तर सततच सायकलवरून जाणे येणे होते.
आप्पा ज्या घरातून आले अशा घरातील लोकांना मान मरातब मिळविण्याची मोठी हौस असते. त्यासाठी गावगाड्यात लक्ष घालणे, गावच्या सत्तास्थानांवर पकड ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणे हा सहज स्वभाव असतो. पण आप्पांचे पहिले प्रेम म्हणजे आपले शेतच राहिले. पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी केवळ आपल्यापुरतेच पाहिले. दुसऱ्याच्या अडचणीला धावून जाणे हासुद्धा सच्च्या शेतकऱ्याच्या स्वभावाचा एक भाग असतो. गावातील गोरगरिबाच्या घरात लग्न निघाले तर त्यांच्या मदतीला आप्पा धावून गेले आहेत. बारामतीच्या कापडदुकानात स्वत:च्या पतीवर अनेकांचे लग्नाचे बस्ते त्यांनी बांधून दिले आहेत. त्यानंतर पैसे भरण्यासाठी आलेल्या नोटीसांनाही उत्तर दिले आहे आणि पदरचे पैसेही भरले आहे. त्यानंतर जसे जमेल तसे त्या कुटुबांकडून ही रक्कम जमा करून घेतली आहे.
त्यांच्या या सच्चेपणाची एक हकिगत अशी की १९७७ च्या आणीबाणीत सरकारची सोने गहाण ठेऊन व्याजाने पैसे देणाऱ्या सावकारांवर वक्रदृष्टी वळली. त्यावेळी अशा सावकारांकडे असलेले सोने कोणतीही रक्कम न देता घेऊन जाण्याचे आवाहन सरकारने लोकांना केले. या संधीचा फायदा अनेकांनी घेतला. पण या स्थितीतही चोख व्यवहार करून सावकाराची रक्कम देऊन आपले सोने सोडवणारे जे मोजके लोक होते, त्यामध्ये एक आप्पा होते.
तीन पिढ्यांच्या प्रामाणिक व अथक प्रयत्नांनंतर शेतीचा झालेला विस्तार व विकासाबरोबरच या कुटुंबाने शेतीपूरक व्यवसायाकडे आपले लक्ष केंद्रित केले आणि दुग्धाोत्पादनाच्या – पशूपालनाच्या व्यवसायाची सुरवात केली. आजच्या घडीला कमी टक्केवारीत गाई, म्हैशी आणि कालवडी मिळून शंभरावर दुभती जनावरे त्यांच्या गोठ्यात आहेत. या कुटुंबातील नव्या पिढीतील सुशिक्षित तरूण मंडळी आज स्वतः शेतात व गुरांच्या गोठ्यात राबताना दिसतात. रोजचे दुध उत्पादन ३०० ते ३५० लिटर असून ५० ते ५५ कुटुंबांना या कुटुंबाकडून रोजगार मिळाला आहे. शेतमजूर व कामगारांचा रोजचा पगार २० ते २२ हजार इतका असून मासिक उलाढाल पाच-सहा लाखांची होते. स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती करून साधारणतः पन्नास पंचावन्न कुटुंबांच्या रोजगाराचा प्रश्न या कुटुंबातील कर्तृत्ववान व्यक्तींमुळे मार्गी लागण्यास मोलाची मदत झाली आहे.
या घराची आणखी एक परंपरा आहे. या घराने आजपर्यंत आपल्या घरातील जनावर कसाबाला विकलेले नाही. गाय किंवा म्हैस जोपर्यंत दुभती आहे, तोवरच खरेदी विक्री. भाकड गाय, म्हैस किंवा वळू दारात मरेपर्यंत सांभाळली पण कसाबाला कधी दिली नाही. आज त्यांच्या गोठ्यात गाय, म्हैस, खिलार गायी, बैल, कालवडी, वळू, रेडे मिळून १०५ जनावरे आहेत. आता बैल आणि बैलगाडीचा जमाना संपला आहे, पण या यांच्या घरात अजूनही बैलगाडी चालू स्थितीतील आहे.
आजच्या घडीला विभक्त कुटुंबाचे प्रमाण वाढत चालले आहे. पण धनसिंगआप्पांच्या या घरात चार पिढ्या एकत्र नांदत आहेत. आप्पा त्यांच्या वडिलांचे एकुलते एक. त्यांना एकच बहिण. आप्पांनाही एकच मुलगा. त्यांचे नाव संभाजीकाका. त्यांना तीन मुले. ही सगळी मुले आता चाळीशीच्या पुढे आहेत. काही वर्षात या मुलांची मुलेही लग्नाला येतील. पण सगळे जण आजही बुरुंजाच्या आपल्या वडिलोपार्जित वाड्यात गुण्यागोविंदाने रहात आहेत.
वय वर्षे ८७ असलेल्या धनसिंगआप्पांचे शेतात राबणारे शरीर या वयातही त्यांना पुर्ण साथ देते आहे. अजूनही एखाद्या तरुणाच्या उमेदीने हा माणुस स्वप्न बघतो. अर्थातच ही स्वप्ने शेतीशी संबंधितच असतात. आणि या स्वप्नाच्या पुर्ततेसाठी आप्पा पुन्हा सकाळी सकाळी आपल्या काळ्या आईच्या सेवेसाठी आपल्या शेताची वाट धरू लागतात.
बुरुंजबाबांच्या वाड्याच्या या कहाणीबाबतच्या आपल्या प्रतिक्रिया कृपया या ८८८८६५५७५७ मोबाईल क्रमांकावर सत्यजीत जगताप यांना कळवाव्या ही विनंती.
( आपलीही कहाणी या लेखमालेत यावी अशी आपली इच्छा असेल तर कृपया ९८८१०९८१३८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा )