दौलतराव पिसाळ – महान्यूज लाईव्ह
वाई : वाईच्या औद्योगिक वसाहतीतील गैरसोयी, वाढत चाललेली अतिक्रमणे यावर लघुउद्योजकांच्या संघटनेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून या गंभीर बाबींकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
वाईच्या एमआयडीसीतील स्मॉल स्केल इंडिया लिमिटेड असोसिएशन च्या वतीने साताऱ्याच्या जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनानुसार वाईच्या एमआयडीसी कार्यक्षेत्रात मागील ७-८ महिन्यांपासून रस्त्यावरील बरेचसे पथदिवे बंद आहेत. एम. आय. डी. सी. चे मागील वीजबील तपासून खात्री करून घेतली, तर हे लक्षात येईल असे संघटनेने स्पष्ट केले आहे.
औद्योगिक वसाहतीत स्थानिक ठेकेदार देऊन पाठीमागील कार्यपध्दतीप्रमाणे त्याची बिले काढताना संघटनेच्या उपाध्यक्ष, सचिवांपैकी किमान दोन जणांच्या स्वाक्षरी घ्याव्यात. जेणेकरून त्यांनी केलेल्या कामांची कारणमिमांसा होईलच, शिवाय पारदर्शक पध्दतीने कामे होतील.
एमआयडीसीत सध्या रस्त्याची कामे सुरू आहेत. परंतु फक्त डांबरखडीचा थर न टाकता ७० ते ८० टन वजन भार असलेले ट्रक येथून ये जा करीत असतात, त्याचा विचार करून रस्ते बनवावेत अशी मागणी देखील संघटनेने केली आहे. एमआयडीसी रस्त्यांवरील अतिक्रमणे काढावीत व ती तातडीने काढावीत अशीही मागणी संघटनेने केली आहे.