दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे अवघ्या आठ दिवसात १९ हजार ५६० मॅट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. तर ८ हजार १२५ साखर पोत्यांचे उत्पादन निघाले आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काचा असलेला भीमा पाटस तीन वर्षे बंद होता. हा कारखाना सुरू झाला आणि क्षमतेने गाळपास सुरुवात झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी समाधानी आहेत. त्यांना मोठा दिलासा मिळाला.
एम. आर. एन. भीमा शुगर अँड पावर लि. (निराणी ) संचलित भीमा पाटस कारखान्याचा ३९ वा गळीत हंगाम १५ डिसेंबर २०२२ रोजी ऊस मोळी टाकून कारखान्याच्या गाळप हंगामाची सुरुवात करण्यात आली होती. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे गाळप चालू बंद होत असल्याने अडचणी निर्माण होत होत्या.
मात्र सध्या या कारखानाच्या उसाची गाळप प्रक्रिया पूर्वपदावर येत आहे. मागील आठ दिवसात म्हणजे २६ डिसेंबर पर्यंत १९ हजार ५६० मॅट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. ७.८० टक्के साखर उतारा असून ८ हजार १२५ साखर पोती चे उत्पादन निघाले आहे.
दिवसाला तीन ते साडेतीन हजार मॅट्रिक टन उसाचे गाळप होत आहे. तर सरासरी ७.८० टक्के साखर उतारा निघत आहे. यंदाचा चालू गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने चालवण्याचा कारखाना व्यवस्थापकांचा प्रयत्न आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाचा पहिला हप्ता २५०० रुपये जाहीर करण्यात आला असून पंधरा दिवसांनंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार असल्याने ऊस उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.