दौंड : महान्यूज लाईव्ह
ग्रामीण भागातील बळीराजाच्या दृष्टीने व अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना प्रतिनिधित्व देण्याचा निर्णय योग्यच आहे. असे मत दौंड भाजप चे आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन सुधारणा विधेयकावर विधानसभेत ते बोलत होते.
नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात बोलताना आमदार कुल म्हणाले कि, बाजार समितीचा मतदारसंघ होताना सोसायटीच्या मतदारसंघातून तीन गट आणि ग्रामपंचायतमधून नाममात्रच संचालक निवडून दिले जातात. जिल्हा बँक व बाजार समितीमध्ये मतांची जुळवा जुवळ करण्यासाठी व जिल्हा बँक आणि मार्केट कमिटी मध्ये सत्ता राखण्यासाठी अशी सोईची व्यवस्था करण्याचा प्रयत्न यापूर्वी करण्यात आला आहे.
त्यामुळे ग्रामपंचायत आणि सोसायटी यांना समप्रमाणात प्रतिनिधित्व देणे आवश्यक आहे अशी मागणी आमदार कुल यांनी केली. व्यापारी, तोलारी, मापारी व हमाल या सगळ्यांना विचारात घेत असताना बाजार समिती मध्ये माल घालणारा मुख्य घटक असलेल्या शेतकऱ्याकडे मात्र दुर्लक्ष केलं जाते. शेतकऱ्यांना मतदान करण्याचा अधिकार या विधेयकाच्या माध्यामातून देण्यात आला ही चांगली गोष्ट आहे.
शेतकऱ्यांना अधिकार दिल्यावर मतदार खूप मोठी यादी होईल अशी समस्या असेल, तर त्याच्यामध्ये मागील पाच वर्षांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी शेतमाल हा त्या संस्थेमध्ये घातलेला आहे. त्यांचा समावेश थेट मतदार यादीत करण्यात यावा अशी मागणी देखील त्यांनी केली तसेच शेतकऱ्यांसाठी एक स्वतंत्र मतदारसंघ तयार करावा व निम्म्यापेक्षा जास्त सभासदत्व जे शेतकरी बाजार समितीमध्ये आपला माल घालतात, त्यांना दिले जावे अशा प्रकारची देखील मागणी केली.
बाजार समितीचे कामकाज शेतकरी, व्यापारी, मापारी व तोलारी याच्या माध्यमातून चालते, परंतु त्यामध्ये मतदार म्हणून सोसायटी आणि ग्रामपंचायतचा संबंध कुठे येतो हा प्रश्न देखील अनेक वर्षांपासून अनुत्तरीत राहिला आहेत. जिल्हा परिषद किंवा इतर निवडणुका घेतो त्या पद्धतीने बाजार समितीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून निवडणूक लढविण्याची मुभा शेतकऱ्यांना देण्यात यावी. बाजार समितीमध्ये काम करणाऱ्या सर्व घटकांचा त्याच्यामध्ये विचार व्हावा आणि ग्रामपंचायत आणि विशेषतः सोसायटीचे त्या ठिकाणी असणारा प्रतिनिधित्व कमी करून ते शेतकऱ्यांना वाढवून द्यावे अशी मागणी देखील आमदार राहुल कुल यांनी शेवटी केली.