संपादकीय – ज्ञानेश्वर रायते, बारामती.
वारकरी कोण?… माळकरी कोण? ही व्याख्या सातत्याने पुढे येते.. काहीच समजत नाही, तेव्हा बुवा, महाराज या विशेषणांनी माळकऱ्याचा आदराने उल्लेख होतो.. मी देखील माळकरी आहे.. पिढ्यानपिढ्यांचा आहे.. माझी आजी, माझी आई, माझे वडील, मी, माझे कुटुंब आणि आता पुन्हा माझी मुले देखील माळकरी आहेत. ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा घरात वाचली जाते. विजयप्रताप, पांडवप्रतापापासून नवनाथाच्या कथासारापर्यंत.. अन शिवलिलामृतापासून शनिमहात्म्यापर्यंत सारं सारं मनापासून वाचलं जातं..
गेल्या काही दिवसांत एका राजकीय पक्षाच्या महिलेच्या विरोधात तथाकथित वारकरी आंदोलन करताहेत. त्याची जरा किव वाटली म्हणून लिहावं वाटलं.. हल्ली हिंदू आणि हिंदूत्वावर बोलायचं ठरवलं तरी अंगावर काटा यावा असाच बाका प्रसंग देशात उभा राहीलेला दिसतो.. कपड्यांवरून हिंदू खतरे मे अशा घोषणा ऐकायला येत आहेत आणि उगीचच घरात बसून आपल्यावर धार्मिक बॉम्बवर्षाव होतोय असे वाटू लागते.
आता तर गावागावात तथाकथित हिंदूत्ववादी मंडळी येऊन काहीबाही सांगू लागली आहेत. वारकऱ्यांना भडकावून देऊन, त्यातील उजव्या विचारसरणीच्या मंडळींना थेट अध्यात्मिक आघाड्यांमध्ये कोंबून त्यांच्याकडून विशिष्ठ राजकीय पक्षांचा जनाधार निर्माण करताहेत. हे करताना थेट ध्रुवीकरण करू पाहताहेत आणि वैष्णवांचा हा धर्म सहिष्णूतेचा धर्म आहे ही ओळख पूसू पाहताहेत..!
माझा मूळ प्रश्न होता, तो गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वारकऱ्यांच्या आंदोलनाचा. वारकरी ही तुकोबारायांच्या, ज्ञानोबांच्या, संत चोखामहाराज, गाडगेबाबा, संत सावतामहाराज, जनाई, मुक्ताई, सोपानकाकांच्या दिलेल्या अमूल्य ज्ञानसागराच्या वारशाने चालणारी परंपरा.. भागवत संप्रदायाची ही परंपरा.. बुध्दीप्रामाण्यवाद शिकविणारी, त्याच मार्गाने चालणारी, अंधश्रध्देला अजिबात भीक न घालणारी, वास्तवाला भिडणारी परंपरा.. म्हणूनच एकेकाळी उदकी अभंग रक्षिले, कौतुक तुकोबांचे या आरतीतील ओळी देखील वैचारिकदृष्ट्या बंडखोरी दाखवत वारकऱ्यांनी फक्त अभंग रक्षिले, तैसे तुकोबांचे अशा बदलण्यापर्यंतचे धाडस दाखवले.
संत ज्ञानेश्वरांनी पसायदान मागितले, त्यावर बोलण्यापेक्षा आम्ही त्यांनी भिंत कशी चालवली, रेड्यामुखी वेद बोलवले, यावरच किर्तन चालवतो. कसल्या कसल्या दृष्टांत, सिध्दांतांनी किर्तनात आम्ही सहजपणे अंधश्रध्दा चालवतो. तेव्हा काहीच जाणवत नाही की, तुकोबाराय सांगून गेले.. की, विष्णूमय जग, वैष्णवांचा धर्म.. भेदाभेद भ्रम अंमगळ… कर्म करोनी म्हणती साधू.. ऐसे कैसे झाले भोंदू.. अगदी तुकोबाराय हेही सांगून गेले की, परउपकारी नेणे परनिंदा.. परस्त्रिया सदा बहिणी माया.. शांतिरूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडीलांचे, तुका म्हणे हेचि आश्रमाचे फळ.. परमपद बळ वैराग्याचे..!!
हे अभंग कोणीकडे आणि स्वतःला किर्तनकार, प्रवचनकार, प्रबोधनकार.. अगदीच शेवटी माळकरी म्हणवणारे कोणीतरी तथाकथित एका महिलेची जिवंतपणी अंत्ययात्रा काढताना दिसले. हा आमचा वारकरी धर्म आहे का? ते जर फक्त वारकरी असतील, राजकारणी नसतील, तर तुकोबारायांचा वरील अभंग त्यांना माहिती नसावा असे म्हटले तर मूर्खपणाचे ठरेल.
शिवाय जर वारकरी असतील, तर त्यांना विकृत राजकारण खात्रीशीर कळायलाच हवे. सर्व बाजूंनी विचार करायला हवा. सध्या राजकारणात दलबदलूंचा सुकाळ झाला आहे. निष्ठा नावालाही राहीलेली नाही. सगळे बाटगे फिरत आहेत. अशावेळी तो कार्यकर्ता, नेता आज ज्या पक्षात आहे, त्या पक्षाची, त्याच्या विचारधारेची तळी उचलतो. एवढी बेमालूमपणे की, जणू याच्या आज्या, पणज्यांनीच या पक्षाची निर्मिती, स्थापना केली आहे. उद्या ज्या पक्षात जातील, तिथे त्या पक्षाची तळी, तेथील विचारधारा, अगदी पूर्वापार त्या पक्षात असल्यासारखी उचलतात आणि महत्वाचे म्हणजे काल ज्या पक्षात होतो, तो पक्ष किती घाणेरड्या प्रवृत्तीचा आहे, हे सांगायला अजिबात लाजत नाहीत.
अशा घाणेरड्या डबक्यातील ही नेतेमंडळी एकमेकांवर चिखल उडवताना ते आपला वापर करीत आहेत, एवढेही वारकऱ्यांना कळू नये? त्या सुषमा अंधारेंचा विषय थेटच घेऊ. ज्या पक्ष किंवा संघटनेत यापूर्वी या नेत्या होत्या, तेथील विचारधारेनुसार त्यांनी म्हणे काही वर्षांपूर्वी वक्तव्य केलेले व्हिडीओ आता फिरवून वारकऱ्यांना भडकवण्याचे काम तथाकथित हिंदूत्ववादी संघटना, कार्यकर्त्यांनी केले. खरं कारण काय आहे? तर त्या आक्रमकपणे भाषण करतात, आपल्या आवडीच्या पक्षाला अडचणीत आणतात.. म्हणून!
मात्र अशा सडक्या गोष्टींवर आपण किती भडकायचे ? हे वारकऱ्यांनी ठरवावे. किर्तनकारांनी ठरवावे. मुळात भागवत संप्रदायाचा राजकारणासाठी वापर करूच नये. मात्र अलिकडच्या काळात धार्मिक आघाड्या केल्या जात आहेत आणि त्यात माळकऱ्यांनाही ओवले जात आहे. हे अतिशय दुर्दैव आहे. विशिष्ठ पक्षात जाऊन मग ही मंडळी त्या- त्या पक्षाचे थेट मत किर्तनातून मांडू लागली आहेत हे आणखी दुर्दैव..
वारकऱ्यांनो, राजकारण्यांना काय करायचे ते करू द्या… आपला कोणीतरी राजकारणी वापर करतोय याचे भान प्रत्येक माळकऱ्याने ठेवले पाहिजे, तरच तुकोबारायांच्या विचारांचे वारस म्हणवून घेता येईल. तुकोबाराय म्हणून गेले, सालोमालो हरिचे दास। म्हणऊन केला अवघा नास।। अवघें बचमंगळ केलें। म्हणती एकाचे आपुलें। मोडूनि संतांची वचनें। करिती आपणां भूषणें।। तुकोबारायांच्या या उक्तीचा डोक्यावर नाही, डोक्यातून विचार करा आणि आपला भागवत संप्रदाय आहे.. मोहन भागवत संप्रदाय नाही हे मनावर ठसू द्या..
अर्थात जर आपण आपल्या संतांविषयी कोणी काही बोलले तर नाठाळांच्या माथी हाणू काठी असे म्हणणार असू, तर पहिल्यांदा काठी त्यांच्याही डोक्यात बसलीच पाहिजे, जे गेली काही महिने सातत्याने आपल्या महापुरूषांचा अवमान करीत आहेत, जाणीवपूर्वक करीत आहेत… मात्र आपण त्याविषयी काहीच बोलत नाही. फक्त विशिष्ठ दोन राजकीय पक्षांमध्ये असलेल्या राजकीय चिखलफेकीत सरळसरळ एकाची बाजू घेत आहोत, हे सर्वथा योग्य नाही.
हे वारकऱ्यांचे, वारकरी धर्माचे वाटोळे करण्याची चाल आहे, यावर वेळीच बोध घेतला पाहिजे. कोणीतरी म्हणून गेले आहे की, पॉलिटिक्स इज गेम ऑफ रास्कल.. याचा विचार केला, तर किर्तन ऐकायला, प्रबोधन, प्रवचन ऐकायला केवळ एकाच पक्षाची लोक येत नाहीत. सगळेच हिंदू येतात. ज्यांना धर्माचे विकृतीकरण आवडत नाही, मात्र त्यांना धर्म श्रेष्ठ वाटतो. काही जणांना धर्माचे फक्त अवडंबर करायचे आहे या साऱ्यांचा विचार करा. आपला वापर करू देऊ नका. तो करू देणे योग्य ठरणार नाही.
वारकऱ्यांना हे माहितीच आहे की, आपले सगळे संत हे शेतकरी परंपरेतले, अठरापगड जातीतले होते. विठोबावर प्रचंड श्रध्दा असलेल्या या संतांनी कधीच माणसांचा द्वेष शिकवला नाही. त्यांनी माणूसकीचा धर्म शिकवला. त्यांनी कधीही दांभिक अध्यात्म शिकवले नाही. देवाला मानतानाच त्यांनी माणसाला अगोदर महत्वाचे मानले हे विसरता कामा नये.
वारकरी धर्मात, परंपरेत विज्ञान आणि समाजविरोधी काल्पनिक घटनांना महत्व आहे का? निश्चितच नाही. गाडगेबाबांनी त्यांच्या किर्तनातून गावावरची श्रध्दा शिकवली. त्यांनी अंधश्रध्देवर प्रहार केले, ते तुकोबांनीही केले आणि सगळ्याच संतांनी केले. मग संतांच्या नावावर खपवल्या जाणाऱ्या असल्या कपोलकल्पित गोष्टी आपण कशा स्विकारतो?
आजही सदेह वैकुंठावर विश्वास ठेवणारी प्रचंड गर्दी आपण अनुभवतो आहे. माऊलींच्या पसायदानापेक्षा भिंत चालवल्यावर जास्त बोलतो आहे.. किर्तनकार जे जे सांगताहेत त्यावर विश्वास ठेवतोच आहे.. अशावेळी किर्तनकार, वारकऱ्यांची ही जबाबदारी आहे की, समाजातील चांगले वाईट शोधण्याची.. त्यावर बोलण्याची.. आपल्याला जो नैतिक अधिकार आहे, त्यातून वाईटावर प्रहार करण्याची.. राजकारणात आपला वापर करू देण्याची नाही..हे जरूर लक्षात असू द्या…!