कारखान्याचे कार्यकारी संचालक रविकांत पाटील यांची माहिती! भीमा पाटसच्या गाळपास ऊस मोळी टाकून सुरुवात!
दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यासह आसपासच्या काही भागातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी आणि शेतकऱ्यांच्या प्रपंचाची चूल म्हणून ओळखला जाणारा भीमा पाटस साखर कारखाना आजपासून सुरू झाला. शेतकऱ्यांच्या ओट्यावर समृद्धीचा मृदगंध पसरवणारी साखर कारखानदारीची वाटचाल अडचणीची ठरू नये यासाठी अगदी ऊस उत्पादकांनी सुद्धा देव पाण्यात घातले होते आणि अखेर एक शुभवर्तमान म्हणजे, आज पासून भीमा- पाटस चालू झाला! भीमा पाटस च्या चिमणीतून येणारा धूर पाहून शेकडो ऊस उत्पादकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले!
भीमा पाटस सहकारी कारखान्याच्या गाळपाचा शुभारंभ ऊस मोळी टाकून करण्यात आला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाचा पहिला हप्ता २५०० रुपये पंधरा दिवसांनंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल. अशी माहिती भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक तथा निराणी ग्रुपचे अधिकारी रविकांत पाटील यांनी दिली.
मागील तीन वर्षापासून बंद असलेला व तालुक्यातील ऊस उत्पादक सभासदांच्या मालकीचा असलेला भीमा सहकारी साखर कारखान्याच्या गाळपास तीन वर्षांनंतर सुरुवात झाली. गुरुवारी (दि.१५) भीमा पाटस साखर कारखान्याच्या गाळपाचा शुभारंभ दौंड चे आमदार राहुल कुल, माजी आमदार रंजना कुल भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुल व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हस्ते ऊसाची मोळी टाकून करण्यात आली.
याप्रसंगी उपस्थित पत्रकारांशी बोलताना कारखान्याचे कार्यकारी संचालक रविकांत पाटील म्हणाले की, मागील तीन-चार वर्षांपासून हा कारखाना बंद होता.२१ ऑक्टोंबर २०२२ रोजी कायदेशीर करार झाल्याने २२ ऑक्टोंबर पासून कारखान्याचा मशिनरी व इतर यांत्रिक कामास सुरुवात केली. सुरुवात करण्यासाठी काही तांत्रिक अडचणी आल्या, मात्र सध्या कारखान्याचे काम पूर्ण झाल्याने कारखान्याचे गाळप पूर्ण क्षमतेने करण्यात येणार आहे.
साडेपाच हजार टनापर्यंत गाळप होण्याइतपत ऊस तोडणी वाहतुकीचे नियोजन केले आहे. इथेनॉल ची क्षमता लहान असल्याने गाळपाच्या २० ते ३० टक्के इथेनॉल काढता येणार आहे. इथेनॉल आणि साखर चे उत्पादन करण्याचे नियोजन आहे. शंभर दिवस गाळप सुरू राहील असा प्रयत्न राहणार आहे.
कामगारांचे पगारही त्यांच्या खात्यावर जमा होत आहेत. पुढील काळात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही जिल्ह्यातील इतर कारखान्याच्या बरोबरीने एफआरपी प्रमाणे चांगला ऊस दर देण्याचा आमचा प्रयत्न आहे. हा कारखाना चांगल्या पद्धतीने चालवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. दौंडचे आमदार राहुल कुल यांनी हा कारखाना सुरू करण्यासाठी मोठी मदत केली आहे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी, कामगारांनी सहकार्य करावे असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.