फलटण – महान्यूज लाईव्ह
अलिकडच्या काही महिन्यांत लावणीमध्ये इतरांची नावे मागे पडून अचानकच गौतमी पाटील हे नाव पुढे आले आहे.. या गौतमी पाटीलने लावणीच्या कार्यक्रमात अश्लील हावभाव केल्यानंतर तिची हवा झाली. अर्थातच चांगल्याची हवा होतच नाही.. काहीतरी वेगळे करावे लागते, त्यात तिचा दोष काय? पण म्हणून काय प्रत्येक कार्यक्रमातच काहीतरी घडावे का? सांगलीत एक जण जिवानिशी गेला.. आता फलटण तालुक्यात काल रात्रीही म्हणे डोकी फुटाफुटी झाली.
गौतमी पाटील हिचा कार्यक्रम फलटण तालुक्यातील नदीकाठच्या एका गावात झाला. सांगली जिल्ह्यात झालेल्या संकटामुळे इथे तसे काही घडू नये याची तंबी अगोदरच बहुधा संयोजकांना दिली असावी, त्यामुळे काहीजण अगदी तयारीतच होते. त्यामुळे कोणी नाचायला उठला की, त्याला ‘गप्प’ करण्याची वेगळी तजवीज करण्यात आली होती.
जसा कार्यक्रम बहरात आला आणि लोकांना चेव येऊ लागला, तसतसा कार्यक्रम शिस्तीत
च झाला पाहिजे यावर भर असलेल्यांनीही कारवाईचा ‘बडगा’ उगारला. यात काही जणांना चांगलाच मुका मार लागला, तर काही जणांना अगदी रक्तबंबाळ होण्याचीही वेळ आली. रात्रीच्या वेळी काहीजण दवाखाने शोधत फिरत होते, अशीही माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली.
असं म्हणतात की हा महाराष्ट्र टाळाने सुधारला नाही आणि चाळाने बिघडला नाही.. पण अलिकडे काळात चाळ एवढा बिगडायला लागलाय की, माणसं युद्धापेक्षा लावणीतच जास्त घायाळ होऊ लागली आहेत. अध्यक्ष महोदय, यावर काहीतरी निर्णय व्हायला हवा.