कोल्हापूर : महान्युज लाईव्ह
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ इतिहास संशोधक, विचारवंत, साहित्यिक यांची घरी जाऊन भेट घेतली होती. या भेटीनंतर राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. यासंदर्भात ज्येष्ठ साहित्यिक डॉ जयसिंगराव पवार यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे राज ठाकरे यांच्या भेटीचा खुलासा केला आहे.
तो असा … श्री.राज ठाकरे यांच्या कोल्हापूर दौर्यामध्ये माझी भेट घेण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. त्यानुसार ते माझ्या निवासस्थानी आले. तेव्हा इतिहासातील विविध विषयांवर चर्चा झाली. त्यावेळी प्रत्यक्ष इतिहास आणि त्याचा चित्रपटांतून होणारा विपर्यास यावर चर्चा झाली.
मी प्रबोधनकार ठाकरे यांच्या कार्याला उजाळा देऊन आजच्या काळाच्या संदर्भात त्यांच्या कार्याचे महत्व विशद केले. प्रबोधनकारांचा विचार घेऊन मुख्यमंत्री म्हणून सत्तेत आल्यावर आपण महाराष्ट्रात धडाकेबाज काम कराल. त्याचे मी स्वागत करेन,असे मी म्हणालो. माध्यमांमध्ये या विधानाची अतिशयोक्ती झाली. या वेळी त्यांच्याशी बाबासाहेब पुरंदरेंवर काहीही चर्चा झाली नाही.
श्री. राज ठाकरे निघून गेल्यावर पत्रकारांनी पुरंदरेंच्या बद्दल प्रश्न विचारल्यावर मी त्यांच्या इतिहासकार म्हणून गौरवीकरण करणारे विधान केलेले नाही.कारण आतापर्यंत लिखानातून व संशोधनातून पुरंदरे यांच्या विकृत व अनैतिहासिक मांडणीवर अभ्यासपुर्ण टिका केली आहे आणि त्यावर आजही ठाम आहे. या संदर्भात वृत्रपत्रांत प्रसिद्ध बातम्यामुळे माझ्या वैचारिक भुमिकेबद्दल संभ्रम निर्माण होत आहे. म्हणून मी हा खुलासा देत आहे असे डाॅ.जयसिंगराव पवार यांनी स्पष्ट केले आहे.