सातारा – महान्यूज लाईव्ह
गेल्या दोन दिवसांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी प्रकरणावरून खासदार उदयनराजे भोसले चर्चेत आले आहेत. त्यांनी दोनच दिवसांपूर्वी रडू आवरत हे दिवस पाहण्यापेक्षा मेलेलो बरे असे विधान केले होते. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपतींचे वंशज हतबल होऊ शकत नाहीत. उदयनराजेंच्या भावना जिथे पोचायच्या तिथे पोचल्या, मात्र राज्यपालांची नियुक्ती हा सरकारच्या हातातील विषय नाही असे स्पष्टीकरण दिले होते, त्यावर आज उदयनराजे यांनी शिवप्रतापदिनास अनुपस्थित राहत थेट पत्रकार परीषद घेतली व अप्रत्यक्षपणे फडणवीस यांच्या विधानावर संताप व्यक्त करीत सरकारलाही इशारा दिला.
आज पत्रकार परीषदेत उदयनराजे म्हणाले, परवाच्या दिवशी मला गहिवरून आले होते, पण मी काही हतबल झालेलो नाही. आम्ही हातात बांगड्या घातल्या नाहीत. वेळप्रसंगी काय करायचे ते आम्ही ठरवू. लोकांनी विचार करायला पाहिजे. लाज वाटली पाहिजे. असे म्हणतानाच उदयनराजे पत्रकारांना म्हणाले, एवढं सगळं होताना स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे. तुम्ही लोकशाहीच्या चौथ्या स्तंभातले महत्वाचे घटक आहात, तुम्ही त्या लोकांना प्रश्न विचारले पाहिजेत.
राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असतो. त्यांनीपण असे विधान करावे? उद्या आणखी एखादा मोठ्या पदावरचा असे विधान करेल, तुम्ही खपवून घेणार आहात का? संपूर्ण समाज आपल्याकडे बघत असतो. क्षणभर सत्तेत राहण्यासाठी सत्तांतराला मी फारसे महत्व देत नाही, तुमची भूमिका स्पष्ट करणार आहात की नाही असा सवाल त्यांनी अप्रत्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारला.
ते म्हणाले, असे विधान सतत करण्याने हळूहळू लोकांना ही फॅशन वाटेल. ही प्रथा पडेल. हे गैर नाही असे लोकच म्हणतील. ज्या व्यक्तीने संपूर्ण महिलांचा, वडीलधाऱ्यांचा, प्रत्येक धर्मातील नागरिकांचा, धर्मस्थळांचा सगळ्यांचा सन्मान केला, आज त्यांचाच लेखणी, सिनेमा आणि भाषणांतून अपमान करताय. हे आज नाही, तर चालत आलेले आहे. यावर सगळ्यांनी गप्प बसायचे का? तुम्ही कोणत्याही पक्षाचे असाल, जेवढे आमदार असतील, शिवरायांचे तुम्ही जेव्हा नाव घेता, तेव्हा यात राजकारण आणायचं काहीच कारण नाही. प्रत्येक चळवळीचे मूळ प्रेरणास्थान छत्रपती शिवाजीमहाराजच होते. महापुरूषांच्या विरोधात वादग्रस्त लिहीणाऱ्या व वक्तव्य करून अपमान करणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे..