दिल्ली – महान्यूज लाईव्ह
पालघरच्या श्रध्दा वालकरच्या किळसवाण्या हत्येने संपूर्ण देश हादरून गेला आहे. अत्यंत क्रौर्याने हत्या केलेल्या श्रध्दाच्या या घटनेवर येत्या काही दिवसांत संपूर्ण देशात हिंदूत्ववादी संघटनांकडून आवाज उठवला जाण्याची शक्यता आहे, मात्र तेवढ्यातच आम आदमी पार्टीच्या नरेश बालियान यांनी भाजपच्याच एका नेत्याच्या नावाने संशयाची सुई वळवली आहे. या हत्याकांडातील आरोपीशी या नेत्याचे काय संबंध आहेत? असा प्रश्न केला आहे.
श्रध्दा वालकर हिची हत्या अत्यंत थंड डोक्याने करून आफताब पुनावाला याने तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले आणि दररोज तो दिल्लीच्या परिसरात एक- एक तुकडे टाकत होता. अमेरिकन डेक्स्टर ही वेबसिरीज पाहून त्याने हे कृत्य केल्याचे कबुली जबाबात नमूद केल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. यासाठी त्याने ३०० लिटरचा एक फ्रिज खरेदी कला होता. मृतदेहाची दुर्गंधी येऊ नये म्हणून तो रूम फ्रेशनरचा वापर करायचा हेही आता उघडकीस आले आहे.
दरम्यान श्रध्दाच्या हत्येचा उलगडा हा तब्बल ६ महिन्यांनी झाला आहे. श्रध्दा आणि आफताब हे दोघेही वसई भागातील आहेत. या अफेअरला श्रध्दाच्या घरच्यांचा विरोध होता. मात्र मी तुमची मुलगी आहे हे विसरून जा असे वडीलांना सांगून श्रध्दा ही आफताबच्या सोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती.
आफताबकडे तिने लग्नाचा तगादा लावल्याने तिची हत्या करण्यात आल्याचे सांगितेल जात आहे. मात्र या प्रकरणाला अधिक काही कंगोरे आहेत का याचा तपास पोलिस करीत आहेत. हत्येपूर्वी दिल्लीतील मेहरुलीच्या जंगलापासून काही अंतरावर असलेल्या छत्तरपूरमध्ये दोघे काही दिवस राहीले. दोघे एका बहुराष्ट्रीय कंपनीत कॉल सेंटरमध्ये काम करीत होते. त्यातूनच दोघांची मैत्री झाली. मात्र घरचे लग्नाला परवानगी देत नसल्याने व श्रध्दाने लग्नासाठी हट्ट धरल्याने आफताबने तिला दिल्लीत बोलावले.
८ मे रोजी आफताबने तिला दिल्लीत बोलावून घेतले. १९ मे रोजी दोघांमध्ये भांडण झाले आणि रागाच्या भरात आफताबने तिचा फळे चिरायच्या चाकून खून केला. तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले आणि सलग १८ दिवस दररोज हे तुकडे मेहरूलीच्या जंगलात फेकून दिले.
दरम्यान यातील आणखी एक किळसवाणी बाब म्हणजे आफताब हा श्रध्दाच्या मृतदेहाचे जे तुकडे दररोज फेकून द्यायचा, त्यामध्ये त्याचे नंतरही बारकाईने निरीक्षण करायचा की, कोणत्या प्रकारचा अवयवाचा तुकडा लगेच सडतो, त्यानुसार तो ठरवायचा की, कोणता तुकडा फेकून द्यायचा.
आणखी एक गोष्ट म्हणजे श्रध्दाच्या हत्येनंतर कोणाला संशय येऊ नये, तिच्या मित्रांना संशय येऊ नये म्हणून त्याने श्रध्दाच्या सर्व क्रेडीट कार्डची बिले भरली. तिच्या मुंबईतील पत्त्यावर कोणी संपर्क साधू नये म्हणून त्याने हा बनाव रचला. त्यानंतर तिचे सोशल मिडीयावरील अकाऊंट वापरून श्रध्दाच्या मित्रांशीही संवाद साधला.
मात्र दोन महिन्यांपासून श्रध्दाचा फोन येत नसल्याने तिच्या मित्राने तिच्या वडीलांच्या कानावर ही गोष्ट घातली आणि तिच्या वडीलांनी सप्टेंबर महिन्यात मुंबईत आफताब याच्याविरोधात तक्रार दिली. या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी श्रध्दाचे दिल्लीतील शेवटचे लोकेशन शोधून आफताबला समन्स बजावले. त्याला बोलावून घेतले आणि त्याची चौकशी केली. या चौकशीदरम्यान मे पासून श्रध्दाचा फोन बंद असल्याचे आढळले.
दुसरीकडे आपचे नेते नरेश बलियान यांनी एकामागोमाग ट्विट करीत आफताब पूनावाला याचे आडनाव जे पूनावाला आहे, त्यावरून भाजपच्या नेत्याचा याच्याशी नेमका काही संबंध आहे का? असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर भाजप नेते शहजाद पूनावाला यांनी नरेश बलियान यांना वकील नमित सक्सेना यांच्यामार्फत कायदेशीर नोटीस पाठवली आहे.