शिरूर – महान्यूज लाईव्ह
ज्या कामगारांच्या जीवावर आपण मोठे झालात त्या कामगारांची गेली अनेक वर्षांपासून थकीत असलेली देणी कारखान्याचे अध्यक्ष यांनी अद्याप का दिली नाही ? याचे उत्तर कारखान्याचे अध्यक्ष यांनी द्या अशी टीका घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक सुधीर फराटे इनामदार यांनी आमदार अशोक पवार यांच्यावर केली आहे.
रांजणगाव सांडस (ता. शिरूर) येथे घोडगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीनिमित्त आयोजित कोपरासभेत सुधीर फराटे हे बोलत होते. फराटे म्हणाले की, ज्यांच्या कष्टातून साखर कारखाना सध्या सुरू आहे त्या साखर कारखाना कामगारांचे गेल्या सात महिन्यांपासून वेतन थकीत आहे. १२ टक्के पगारवाढ जाहीर करण्यात आली, मात्र एप्रिल २०१९ पासून आजपर्यंतचा फरक थकीत आहे.
कामगारांचे रिटेंशन सन २००९/१० पासून मिळाले नाही. कामगारांचा पी एफ जून २०२२ पासुन भरलेला नाही. विमा पॉलिसीचे हप्ते सात महिन्यांपासून थकीत आहे. घोडगंगा कारखान्यातील ३०/११/२०१७ पासून ११ कामगार मयत झाले आहेत. मयत कामगारांच्या वारसांना सर्व कामगारांच्या पगारातून कापलेला एक दिवसांचा पगार दिला जातो.
एकूण रक्कम ४६ लाख २७ हजार थकबाकी आहे. ४ जुलै २०१८ पासून निवृत्त १६ लोक सेवानिवृत्त झाले आहेत. या कामगारांचे ४० लाख २९ हजार ४२७ रुपये देणे अद्याप बाकी आहे. सन २०१४ पासून २५ कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले त्यांची फायनल बाकी २५ लाख ८० हजार इतकी रक्कम अद्याप बाकी आहे.
एवढी मोठी रक्कम देणे बाकी असताना कारखान्याचे अध्यक्ष मोठ्या बढाया मारत असून कामगारांचा धामाचा पैसा ते कधी देणार आहेत असा सवाल फराटे यांनी केला असून हा कामगारांचा तळतळाट बरा नाही असा खोचक टोला ही फराटे यांनी लगावला.
यावेळी घोडगंगा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे, आबासाहेब गव्हाणे, महेश ढमढेरे, सुरेश पलांडे, सुवर्णा बिभीषण फराटे, मंदाकिनी नागवडे, तात्यासो घाडगे, राहुल गवारी, वीरेंद्र शेलार, सुभाष शेलार, शांताराम कांबळे, पांडुरंग सावित्रा थोरात, अशोक माशेरे, दत्तोबा शेंडगे, अशोक गारगोटे, एकनाथ शेलार, सचिन मचाले, गोविंदराव फराटे, आत्माराम फराटे यांसह उमेदवार, ग्रामस्थ उपस्थित होते.