पंढरपूर : महान्यूज लाईव्ह
चार नोव्हेंबर रोजी होत असल्या पंढरपूरच्या यात्रेसाठी निघालेले वारकरी आज सांगोला जिल्ह्यातील तालुक्यातील जुनोनी गावाजवळ आले असता त्यांच्यावर काळाने घाला घातला. या घटनेत तब्बल सात वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले असून मृतामध्ये पाच महिला व एका बारा वर्षीय मुलाचा समावेश आहे.
हे सर्व वारकरी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील जठारवाडी येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आज संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास ही घटना पंढरपूर सांगोला रस्त्यावरील जुनोनी या गावानजिक घडली. जठारवाडी या गावातून पाच दिवसांपूर्वी पंढरपूरच्या यात्रेसाठी 21 वारकरी चालत निघाले होते.
संध्याकाळची वेळ असल्याने गटागटाने हे वारकरी चालत होते. त्यावेळी अचानक एक चार चाकी वाहन या वारकऱ्यांमध्ये घुसले आणि त्याने वारकऱ्यांना चिरडत नेले. यामध्ये तब्बल 12 जण गंभीररित्या जखमी झाले. त्यामध्ये सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण जखमी असून उपचारासाठी त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेने मोठी खळबळ उडाली.