नायक बारामतीच्या समृद्धीचे भाग २
घनश्याम केळकर
” या वाघानी सगळं खड्ड्यात घातले ” आजुबाजुचे लोक बोलत होते. पण सगळी ताकद एकवटून लक्षावर झेप घेण्यासाठी काळीज वाघाचच लागत. अतोनात खर्च करून आणि श्रम करूनही जर यश हाताला लागले नाही तर ” सगळे खड्ड्यात घातले ” असे लोक म्हणतात. पण बारामती तालुक्यात असाही एक वाघ आहे, त्याने कोट्यावधी रुपये अक्षरश: खड्ड्यात घातले. पण आता याच खड्ड्यातून तो लाखो रुपये कमावतो आहे.
वाडवडिलांनी पिढ्यानपिढ्या जपलेली शेतजमीन वहिताखाली आली पाहिजे या एकाच स्वप्नाने झपाटलेले हे वाघ आहेत बारामती तालुक्यातील कारखेलचे. दिपक शशिकांत वाघ हा माणुस केवळ आडनावानेच नाही तर स्वभावानेही वाघ आहेत. व्यवसायाने पशुवैद्यकिय डॉक्टर असलेल्या वाघांच्या वाट्याला वारशाने १५ एकर जमीन आली होती. मात्र या जमीनीकडे पाहत उसासे सोडण्याशिवाय त्यांच्या हाती काही नव्हते.
पाझर तलावाच्या आसपास खोलगट भागात असलेल्या या जमिनीत गवताचे पाते देखील उगवत नव्हते. पण एकेकाळी ही जमीन फळत फुलत होती. अनेक कारणांनी ती पडीत होत गेली. हे क्षेत्र खड्ड्यात असल्याने पाण्याचा निचरा होईनासा झाला आणि ही जागा क्षारपड होत गेली. दिपक वाघांचे वडिल एरिगेशन खात्यात नोकरीला. नोकरीमुळे त्यांनाही या जमिनीकडे लक्ष पुरवता आले नाही. मात्र वाडवडिलांची ही जमीन वहिताखाली यावी अशी त्यांची इच्छा होती, पण प्रत्यक्षात हे काम प्रचंड पैसा खाणारे आणि तरीदेखील यशाची शाश्वती नसणारे होते.
दिपक यांनी जवळपास पंचवीस वर्षापूर्वी म्हणजे १९९८ मध्ये केवळ वडिलांच्या इच्छेखातर या कामाला हात घालण्याचे ठरवले. त्यानंतर जवळपास २० वर्षे ते जिंकू न शकणारी लढाई लढत होते. पैसे आणि वेळ वाया जात होता, यश जवळपासही दिसत नव्हते, पण या माणसाच्या जिद्दीला मात्र हे अपयश थांबवू शकले नाही.
आज याच क्षेत्रातील सहा एकराच्या क्षेत्रातून वाघांनी ४४० टन ऊस काढला आहे. कारखेलसारख्या बारामतीच्या जिरायती भागात हा एक उच्चांकच समजला पाहिजे. ऊस, गुलछडी, सुर्यफुलासारखी पिके येथे डोलत आहेत. मात्र हे काम अक्षरश: एका ठिकाणाचा डोंगर उचलून दुसरीकडे नेऊन ठेवण्यासारखे होते. दिपक वाघ व्यवसायाने पशुवैद्यकीय डॉक्टर. या क्षेत्रातीलही त्यांचा अनुभव प्रचंड आहे. आसपासच्या ५० – ६० किलोमीटरच्या परिसरात एखाद्या जनावराचे दुखणे तिथल्या स्थानिक पशुवैद्यकीय डॉक्टरच्या लक्षात येईनासे झाले तर त्याचा पहिला फोन वाघांना येतो. याच कारणाने सततची फिरती. शेकडो लोकांच्या भेटीगाठी. यातील बहुतेक सगळे शेतकरी. यांच्याशी होणाऱ्या गप्पागोष्टीतून एक एक गोष्ट कळत गेली. त्यातून एकेक सुधारणा होत गेल्या.
यातलेच एक बापु मांडगे. वाघांच्या शेतावर आल्यानंतर त्यांनी पाण्याचा निचरा होण्यासाठी खोलवर चारी काढण्याची सूचना केली. ही चारी काढली, ती बाहेरून दगड आणून भरली, त्यानंतर पाण्याचा निचरा होण्याची समस्या बऱ्याच अंशी दुर झाली. पण एवढ्याने भागण्यासारखे नव्हते. इथल्या मातीत कसच उरला नव्हता. यासाठी ट्रका भरभरून सहा किलोमीटर अंतरावरून काळी माती आणून भरली. याचप्रमाणे मुरुमही आणून भरला. क्षारता कमी करण्यासाठी जिप्सम सॉल्ट, स्पेंन्ट मड, स्पेंन्ट वॉश आणून टाकले. जमिनीचा कस वाढविण्यासाठी पोल्ट्रीचे खत, शेणखत,गांडूळखत, लेंडीखत जसे मिळेल तसे आणून जमिनीत मिसळले.
जसा हाती पैसा आला तर तसा या खड्ड्यात घातला. यात मध्येच दु्ष्काळ आला. तीनचार वर्षे दुष्काळाने होरपळून निघाली. केलेले कष्ट आणि ओतलेला पैसा या खड्ड्यातच जाणार अशी स्पष्ट चिन्हे दिसू लागली. एकवेळ तर अशी आली की मुलांच्या शिक्षणासाठीही खर्चायला हाती पैसा उरला नाही. या वेळेपर्यंत या कामात ८० ते ९० लाखाचा खर्च होऊन गेला होता. पण हे दिवसदेखील गेले. एका बाजूला सततच्या प्रयत्नांनी जमिनीचा कस वाढू लागला. जमिनीतील क्षारता कमी झाली. याच काळात जनाई शिरसाई उपसा योजनाही सुरु झाली. या योजनेतून शेतात पाणी आले. शेतात विहीरही उभी राहिली. येथून मात्र यशाचा मार्ग स्पष्ट दिसू लागला. या क्षेत्रात लावलेल्या ऊसाचे १५ लाख जेव्हा हाती आले, त्यावेळी खऱ्या अर्थाने वाघांनी ही लढाई जिंकलेली होती.
या सगळ्या लढाईत दिपक वाघांना साथ मिळाली ती बारामतीच्या नेतृत्वाने उभारलेल्या संस्थांची, उभ्या केलेल्या विकासाच्या कामांची. जनाई शिरसाई योजनेने त्यांच्या जगण्यात प्रचंड परिवर्तन घडविले. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, माळेगाव सहकारी साखर कारखाना, शारदानगरचे कृषी विज्ञान केंद्र या शेतीशी संबंधित संस्थांमधील तज्ञांचे मार्गदर्शन वेळोवेळी उपलब्ध होत गेले. या सगळ्यांच्या साथीने हे काम साधता आले याची कृतज्ञता त्यांच्या बोलण्यातून वेळोवेळी व्यक्त होत असते.
आज तीसचाळीस किलोमीटरचे अंतर कापून एखाद्या पशुधनाला तपासण्यासाठी दिपक वाघ एखाद्या शेतकऱ्याच्या घरी पोचतात, त्यावेळी सकाळी आठ नऊ वाजता झोपेतून उठलेले त्या शेतकऱ्याचे तरुण पोरग ज्यावेळी दात घासताना दिसते त्यावेळी त्यांच्या डोक्यात तिडिक जाते. कष्टाशिवाय पर्याय नाही हे त्यांचे ठाम मत आहे. हे त्यांना शिकवले ते त्यांच्या शेताने. ऐकेकाळी आपल्याला सरकारी नोकरी लावली नाही म्हणून घरच्यांवर प्रचंड रागावलेले दिपकजी आज आपण त्या दिशेला गेलो नाही यासाठी देवाचे आभार मानतात. आज कितीही शारिरिक मानसिक कष्ट करून आल्यानंतरही ज्यावेळी ते त्यांच्या शेतात जातात, त्यावेळी सगळा शीण क्षणार्धात निघून जातो.
पंचवीस वर्षापूर्वी या जमिनीवर ते करत असलेला खर्च पाहून अनेकांनी त्यांना वेड्यात काढले होते. पण त्यांचे हेच वेडेपण आता सगळ्यांच्या कौतुकाचा विषय ठरलेले आहे.
दिपक वाघांना तुम्ही 9923462261 या व्हाटसएप नंबरवर संपर्क साधू शकता.
( आपल्याही संघर्षाची कहाणी या सदरात येऊ शकते. कृपया ९८८१०९८१३८ या क्रमांकावर संपर्क साधावा )
खूप छान
अश्या प्रकारचे प्रेरणादायी संघर्ष वाचायला बरं वाटतं