राजेंद्र झेंडे
दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील वरवंड व कुरकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी रात्री अचानक भेट दिली. यावेळी आरोग्य केंद्रात आरोग्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित आहेत का? याची पाहणी करत, तपासणी केली. दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या रात्री अचानक कधीही धाड पडत असल्याने जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांना रात्रभर रुग्णालयात जागावे लागत असल्याचे चित्र आहे. परिणामी ग्रामीण भागातील आरोग्य रुग्णालये आता २४ तास उघडे असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
आरोग्य विभागाचे आयुक्त व राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक तुकाराम मुंढे यांनी आरोग्य विभागाचा कार्यभार स्वीकारल्याने जिल्हा आरोग्य विभागाने त्यांचा चांगलाच धसका घेतलेला दिसत आहे. तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारताच रुग्णांना आरोग्य सेवा व्यवस्थित मिळावी, रुग्णालयातील होणारे गैरप्रकार व भोंगळ कारभाराला आळा बसावा यासाठी लक्ष घातले आहे. त्यांनी काही दिवसापूर्वी पुणे जिल्ह्यातील वाघोली व आळंदी या भागातील आरोग्य रुग्णालयास रात्री भेट देऊन पाहणी केली होती. त्यावेळी आरोग्य अधिकारी आरोग्य कर्मचारी रात्रीच्या वेळेस उपस्थित नसल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यामुळे या कारवाईच्या धसक्याने आता जिल्ह्यातील व ग्रामीण भागातील आरोग्य रुग्णालये चोवीस तास उघडे असल्याचे पहावयास मिळत आहे.
त्याच अनुषंगाने पुणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर भगवान पवार व डॉक्टर अनिल निगोट यांनी दौंड तालुक्यातील वरवंड व कुरकुंभ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मंगळवारी रात्री अचानक भेट दिली. त्यांनी आरोग्य केंद्र उघडे आहे का ? आरोग्य अधिकारी कर्मचारी उपस्थित आहेत का? रुग्णांना व्यवस्थित रुग्णसेवा मिळते का त्यांची गैरसोय होते का? याबाबत पाहणी करत त्या अनुषंगाने तपासणी केली.
दरम्यान, याप्रसंगी वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिवराणी पांचाळ तसेच कुरकुंभ येथील आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र माळी व आरोग्य कर्मचारी हे रुग्णालयातच उपस्थित असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भगवान पवार यांनी समाधान व्यक्त केले.