दौंड महान्यूज लाईव्ह
टोमॅटोची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या रावणगाव येथे झालेल्या अपघातात पाच ते सहा महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यापैकी तीन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर जखमींना दौंड व भिगवण येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
टोमॅटोने भरलेला ट्रॅक्टर शेतातून बाहेर काढत असताना ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. संध्याकाळी पाच वाजता हा अपघात झाला. यामध्ये ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॉलीत बसून निघालेल्या महिला या ट्रॉलीखाली सापडल्या. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या.
टोमॅटोचे ७५ ते ८० क्रेट यामध्ये होते. टोमॅटो घेऊन ट्रॅक्टर ट्रॉलीसह शेतातून बाहेर पडताना खडकवासला कालव्याच्या ३२ व्या क्रमांकाच्या वितरीकेवरून निघाला होता. त्यामध्ये चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात घडला. त्यामध्ये नऊ महिला होत्या. रावणगाव परिसरातील या महिला होत्या. उपचारादरम्यान यापैकी तीन महिलांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात मिळत असलेल्या माहितीनुसार रावणगाव येथील अपघातात मृत्यू झालेल्या महिलांची नावे सुरेखा बाळू पानसरे, रेश्मा भाऊ पानसरे व अश्विनी प्रमोद आटोळे असून सुरेखा व रेश्मा या दोन्ही सख्ख्या जावा आहेत.