बारामती – कोरोनापासून पोरांना मोबाईलपुढे सगळे जग फिके वाटू लागले आहे. आईबाप कोणत्या परिस्थितीतून आपल्याला घेऊन जगत आहेत, याची पोरांच्या मनात काही आस्था उरली नाही आणि पालकांना आपले नेमके काय चुकतेय हे कळायला मार्ग नाही.
बारामती तालुक्यात मोलमजूरी करणाऱ्या आईने नवीन मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून नववीतला पोरगा नैराश्यात गेला आणि त्याने चक्क थेट गळफास घेऊन जीवनच संपवले.. हे जीवन सुंदर आहे असे म्हणायलाही त्याने जागा ठेवली नाही. बारामती तालुक्यातील कऱ्हावागज येथील नववीतल्या शाळकरी मुलाची आत्महत्या झाली. मात्र एकूणच राज्यभऱातील पालकांसाठी ही चिंतेची बातमी ठरली आहे.
शुभम मोतीराम धोत्रे असे या शाळकरी मुलाचे नाव आहे. तो अंजनगाव येथील सोमेश्वर विद्यालयात इयत्ता नववीमध्ये शिकत होता. मिळालेल्या माहितीनुसार शुभमचे वडील निवर्तले आहेत. त्याची आई मोलमजुरी करून उदरनिर्वाह करते.
शुभम गेल्या काही दिवसांपासून आईकडे नवीन मोबाईल घेण्यासाठी हट्ट करीत होता. पण परिस्थितीमुळे आई मोबाईल घेऊ शकत नव्हती. त्यातून निराश झालेल्या शुभमने गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण अवचर यांनी घटनास्थळाला भेट देत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अधिक तपास माळेगाव पोलीस करीत आहेत.