विक्रम वरे महान्यूज लाईव्ह
बारामती – राज्यातील सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सलग दोन वर्ष कोरोनामुळे सभा ऑनलाईन झाल्या होत्या मात्र मात्र यावर्षी ऑफलाइन पद्धतीने वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहेत. २९ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील छत्रपती, सोमेश्वर व माळेगाव कारखान्याची वार्षिक सभा होणार आहे.
गेली दोन वर्ष सभा ऑनलाईन झाल्यामुळे सभासदांना आपले काही प्रश्न मांडता आले नव्हते, त्यामुळे आता दोन वर्षाच्या कालखंडानंतर समोरा-समोर सभासदांना आपले प्रश्न मांडता येणार आहेत. त्यावर सत्ताधारी काय उत्तर देतात व कसा मार्ग काढतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
माळेगाव व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा ही दहा गावांच्या मुद्द्यावर वादळी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील दहा गावांची मागणी माळेगाव सहकारी साखर कारखान्याने केली आहे.
सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील दहा गावे माळेगाव सहकारी साखर कारखान्याला जोडली जाणार की नाही? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र सोमेश्वर कारखान्याने याबाबत कोणताही निर्णय न घेता सोमेश्वरच्या संचालक मंडळाने हा विषय 29 सप्टेंबर रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांपुढे हा विषय ठेवून निर्णय घेण्याचे ठरवले आहे. या निर्णयाला सभासद मान्यता देतात की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याला अंजनगाव,जळगाव कडेपठार, जळगाव सुपे, देऊळगाव, कारखेल, भिलारवाडी, नारोळी, कोरोळी, काऱ्हाटी, खराडेवाडी ही दहा गावे उसासाठी की राजकीय फायद्यासाठी पाहिजेत अशा चर्चा सभासदांमध्ये रंगल्या आहेत.
या प्रश्नावर माळेगाव व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सत्ताधारी व विरोधकांनी गावभेट दौऱ्याला सुरुवात केली असून आपापल्या पद्धतीने सभासदांना महत्त्व पटवून देत आहेत. त्यामुळे दहा गावांचा मुद्दा निकाली निघतो की नाही हे माळेगाव, सोमेश्वर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यावरच समजेल.
दुसरीकडे छत्रपती कारखान्याचीही वार्षिक सभा गुरूवारीच होत असून त्या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या छत्रपती शिक्षण संस्थेच्या भवानीनगर येथील हायस्कूलसमोर जय्यत तयारी करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या भाजप नेत्यांच्या दौऱ्याचाही कंगोरा या सभेला लागण्याची शक्यता आहे.