जुन्नर – महान्यूज लाईव्ह
पतसंस्थेचे लोक अपशब्द वापरतात.. शिवीगाळ करतात.. फायनान्सवाले दमदाटी करतात.. शेतमालाला बाजारात भाव नाही..पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शेतीवर कंट्रोल नाही..म्हणत मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि शेततळ्यात उडी मारून जुन्नरच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली.
दशरथ लक्ष्मण केदारी (वय ३० रा. वडगाव आनंद, ता. जुन्नर जि. पुणे) असे या शेतकऱ्याचे नाव असून या शेतकऱ्याने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आणि रानमळा येथील शेततळ्यात उडी मारली.
कर्जबाजारी झाल्याने शेतकऱ्याने आत्महत्या करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने याची चर्चा झाली आणि परिसरात खळबळ उडाली. आत्महत्या करण्यापूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीत नरेंद्र मोदींचा शेतीवर कंट्रोल नाही. याला केंद्र व राज्य सरकार जबाबदार आहे. काहीच पर्याय दिसत नसल्याने जीवनाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे या शेतकऱ्याने नमूद केले आहे.