बारामती – महान्यूज लाईव्ह
बारामती नगरपरीषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी बारामतीत एक दिवसाआड पाणी सुटणार असल्याचे एक परिपत्रक जाहीर केले. गेल्या काही वर्षात एख दिवसाआड पाणी असा पुरवठा होत नव्हता. त्यामुळे त्याची चर्चा होणार, परंतू काही वर्षांपूर्वी एक दिवसाआड पाणीपुरवठा होत होता. त्यामुळे ते काही नवीन नाही, मात्र आता त्याची चर्चा होण्याचे कारण म्हणजे सध्या कालव्याचे अस्तरीकरणाचा विषय ऐरणीवर आहे आणि त्याला जोडण्याचे काम कालवा अस्तरीकरणाला विरोध असणाऱ्यांकडून केले जात असल्याने बारामती शहरापेक्षा इतरत्रच त्याची चर्चा अधिक होताना दिसत आहे.
बारामतीतील या भागात २१ सप्टेंबर रोजी पाणी पुरवठा होणार नाही, त्यानंतर २२ सप्टेंबरपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.
हा भाग – कोष्टी गल्ली, श्रावण गल्ली, क्षत्रियनगर, मेडदरोड, पतंगशहानगर, महादेव मळा, सदगुरूनगर, अवचट इस्टेट, ख्रिश्चन कॉलनी, वसंतनगर, अवधूतनगर, व्हील कॉलनी, तपोवन कॉलनी, विवेकानंदनगर, म्हाडा कॉलनी, मुजावरवाडा, देवळेइस्टेट, वडार सोसायटी, पानगल्ली, समर्थनगर, आमराई, विठ्ठलनगर, सुहासनगर, चंद्रमणीनगर, कोअर हाऊस, इंदापूर रोड व सटवाजीनगर आणि एसटी स्टॅण्ड परिसर या ठिकाणी २१ सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा होणार नाही.
गुरूवारी २३ सप्टेंबर रोजी खालील भागात पाणीपुरवठा होणार नाही. त्यानंतर एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. हा भाग – कचेरी रोड, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, हंबीर बोळ, महावीर पथ, सिध्देश्वर गल्ली, मारवाड पेठ, तांदूळवाडी वेस चौक, बुरूडगल्ली, नेवसे रोड, संपूर्ण कसबा परिसर, लक्ष्मीनारायणनगर, माळेगाव रोड, जामदार रोड, खंडोबानगर, जवाहरनगर, पोस्ट रोड, विजयनगर, साईगणेशनगर, अकल्पित सोसायटी, अशोकनगर, आनंदनगर, मयुरेश्वर अपार्टमेंट,भिगवण रोड, सिध्दार्थनगर आदी भागाचा यामध्ये समावेश आहे.
बारामती सोडून इतर तालुक्यांतच का होतेय चर्चा अधिक?
निरा डावा कालवा बंद झाल्यानंतर बारामतीत आता एक दिवसाआड पाणी द्यावे लागणार असल्याचे नगरपरीषदेने जाहीर केले आहे. बारामती नगरपरीषदेने हे परिपत्रक शहरातील संबंधित ठिकाणच्या नागरिकांना माहिती व्हावे म्हणून काढले, मात्र त्याच्या सोशल मिडीयात पोस्ट अधिक फिरवल्या गेल्या आणि त्याला कालव्याच्या अस्तरीकरणाचा विषय जोडण्यात आला.
बघा, कालवा अस्तरीकरणामुळे आताच पाण्याची पाणीबाणी होतेय, शहराचे सोडा, आपण सावध व्हा, अस्तरीकरणाला विरोध करा अशा प्रकारची सोशल मिडीयात काही जणांनी चर्चा सुरू केली आणि पाहता पाहता त्याचे लोण बारामती शहर सोडून, तालुका सोडून इतरही तालुक्यापर्यंत पोचले आहे.