संपादकीय
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नामिबियातून आठ चित्ते आणले गेले. त्यासाठी खास विमानाची व नामिबियातील वन्यप्राणी संवर्धन मंडळाची वाक्बगार कर्मचारीदेखील होते. आज मध्य प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या चितत्यांना नव्याने केलेल्या १२ किलोमीटरच्या परिघातील क्वारंटाईन क्षेत्रात सोडण्यात आले.
तब्बल ७० वर्षांनी चित्ते भारतात पुन्हा परतले. याचा आनंद आहेच. शिवाय नरेंद्र मोदींचा वाढदिवसही असा वेगळ्या प्रकारे साजरा करण्यात आल्याने त्याचीही चर्चा झाली. काहीही झाले, तरी भारतातून नामशेष झालेला चित्ता पुन्हा भारतात आला, हे कौतुकास्पदच आहे.
विषय आहे, तो त्यानिमित्ताने सुरू झालेल्या प्रपोगांडाचा..! आज एक शेर ने चित्तोंको छोडा है.. पहले नेता कबूतर छोडा करते थे.. यही है फर्क..! यासह अनेक अशाच स्लोगन लिहून भाजपच्या आय़टी सेल प्रणित पोस्टनी आज नेहमीप्रमाणे सोशल मिडियावर धुमाकूळ घातला.
खरेतर या चित्त्यांचे आगमन, स्वागतासाठी देशातील सामान्य नागरिकांपेक्षा वृत्तवाहिन्या, ज्यांना पान-अर्धा पान जाहीराती दिल्या, ती वृत्तपत्रे तुटून पडली. अगदी लाळ गळेस्तोवर शहरांमध्ये बसणारे संपादक त्यावर शाईची ओघळ मारत होते. चांगल्या गोष्टींचे कौतुक करायला काहीच हरकत नाही.
मुद्दा हा आहे की, या देशातील चौथ्या स्तंभाची विश्वसनीयता पार रसातळाला घालवण्यामागे ठराविक विचारांची पत्रकारांची कंपूशाही कारणीभूत आहे की, भांडवलशाहीचे जोखड? कारण आज कोणीच टिका केली नाही, ही गोष्ट अलाहिदा.. मात्र चित्ते आणले जाणार, त्यांची रसभरीत वर्णने होणार याची दोन दिवसांपासून नेटकऱ्यांनी सोशल मिडियावर जणू जाहीरात सुरू ठेवली होती. त्यातही त्यांनी वृत्तवाहिन्यांना लक्ष्य केले होते. अगदी तसेच घडले. त्यामुळे हळूहळू लोकांमध्ये असलेली वृत्तवाहिन्यांची विश्वासार्हता लयाला चालली आहे याला अनुलक्षून अशा घटना घडतात.
आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनीही मुंबईत पेंग्विन आणले. पेंग्विन भारतात नाहीतच, त्यांनी ते आणले. चांगली गोष्ट झाली. मात्र या पेंग्विनवरून जी टिका सुरू झाली, ती माध्यमांनीच तळहातावर अधिक झेलली. तिथे माध्यमांमधील वेळसांडू पत्रकारांच्या लेखण्या का शरमल्या नाहीत?
शेवटी सार हेच की, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाबाबत सगळीकडे निराशा आहे. सध्या तारखेवर तारखा देणाऱ्या न्यायव्यवस्थेवरही लोकांचे लक्ष आहे. जेव्हा काहीतरी चुकले आहे असे दिसेल, तेव्हा सारेच स्तंभ डळमळीत झालेत, समजून जनता हतबल होईल.
एकाच शब्दात सांगायचे तर पत्रकार निष्पक्ष असतो का? तर नक्कीच नाही. तो कोणत्याही राजकीय पक्षाचा थेट सदस्य नसला, तरी त्याची विचारधारा असते. काहींची थेट दिसते, काहींची ती दिसत नाही. फक्त कृती आणि पडद्याआडून त्यांचे काम सुरू असते, ती माहिती व्हायला वेळ लागतो एवढेच..!
चित्त्यांची कौतुकाची दुलई अशीच आहे.. ज्यांना सन २०१४ मध्ये देशभर फिरणाऱ्या मोदींची हवा करताना ते ज्या विमानातून उतरत, त्यावरील अस्पष्ट होत जाणारे अदानी
हे नाव दिसलेच नाही…!