सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर – रांझणी देवाची (ता. माढा) येथील संयमी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय भैरु जाधव यांनी आतापर्यंत तब्बल ७७ वेळा रक्तदान केले आहे. माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाधव यांनी त्यांच्या रक्तदानाची ७७ वी वेळ पूर्ण केली..
रक्तदाते म्हणून परिसरात परिचित असणाऱ्या दत्तात्रय जाधव यांनी आजपर्यंत ७६ वेळी रक्तदान केले होते. त्यांनी आमदार बबनदादा शिंदे यांच्या ७१ वाढदिवसाच्या निमित्त त्यांनी ७७ व्या वेळी रक्तदान करत आज पर्यंत त्यांनी २७ लिटर रक्त रक्तदान केले आहे. त्यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. दत्तात्रय जाधव यांच्या कार्याची दखल घेऊन रांझणी ग्रामपंचायतीच्या वतीने जाधव यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला..
दत्तात्रय भैरु जाधव यांनी आपला फोटोग्राफी व्यवसाय सांभाळत रांझणी (ता. माढा) येथे संयमी सेवाभावी संस्था निर्माण करत सामाजिक कार्याला सुरुवात केली आहे.या संस्थेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर, महिलांसाठी मेळावे,गोरगरीब कुटुंबांना धान्य किराणा वाटप केले आहे.तसेच या संस्थेच्या माध्यमातून अचानकपणे कोणाला रक्ताची गरज पडल्यास संस्थेतील सदस्य रक्त पुरवठा करतात.
दत्तात्रय भैरु जाधव यांनी केलेल्या सामाजिक कार्याची व रक्तदानाची दखल आजपर्यंत अनेक सामाजिक संस्थेने घेतली असून त्यांना आजपर्यंत दौंड येथील स्व.रोहिणी जाधव ट्रस्टचा राज्यस्तरीय रक्तदाता पुरस्कार,वसुंधरा रुरल डेव्हलपमेंट अँड रिचार्ज सेंटर इंदापूरचा रक्तप्रेमी पुरस्कार,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मित्र मंडळ रांझणीचा समाजभूषण पुरस्कार, संजीवनी ट्रस्ट इंदापूरचा सामाजिक पुरस्कार, मुक्ताई रक्तपेढी इंदापूरचा रक्त प्रणित पुरस्कार, श्री नारायणदास रामदास शहा इंदापूरचा स्वेच्चीक रक्तदाता पुरस्कार, लातूर येथील कोरोना योद्धा पुरस्कार आदी पुरस्काराने अनेक सामाजिक संस्थेने त्यांना गौरविले आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी शिवाजीराव पाटील, माजी कृषी व संवर्धन सभापती संजय दादा पाटील, उपसभापती धनाजी जवळगे, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक वेताळ अण्णा जाधव, मुक्ताई रक्तपेढी इंदापूर चे अविनाश ननवरे, सोसायटीचे चेअरमन अतुल जाधव , पांडुरंग माने विद्यमान सरपंच, चित्राताई वाघ, रमेश पाटील,संचालक हिम्मत भाऊ सोलंकर ,सौदागर पोळ, प्रभाकर बागल , डॉ.विनोद चव्हाण ,साहेबराव जाधव, घाडगे आबा,अमित पाटील राजेंद्र राजमाने तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.डी.मरगर यांनी केले तर आभार वेताळ आण्णा जाधव यांनी मानले.आज रांझणी येथे इंदापूर मधील मुक्ताई रक्त पेढीने 321 बाटल्या रक्तसंचय केले.
दत्तात्रय जाधव म्हणाले की, इंदापूर येथील डॉ. मिलिंद खाडे व डॉ.कल्पना खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी आजपर्यंत ७७ वेळा रक्तदान केले आहे. मी लवकरच येणाऱ्या काळामध्ये डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली १०० व्या वेळी रक्तदान करण्याचा माझा मानस आहे.