राजेंद्र झेंडे – महान्यूज लाईव्ह
शेतकरी हाडाचा संशोधक असतो असे म्हणतात… तो सातत्याने नवनवीन कल्पना शोधत असतो.. आणि अलिकडच्या काळात याच शेतकऱ्यांना लहरी हवामान, तीव्र चढउताराच्या बाजारपेठा आणि सरकारी उदासिन धोरणे यामुळे पिकेल ते विकण्यापेक्षा विकेल ते पिकवण्याकडे प्रवृत्त केले आहे. त्यामुळे बिगरहंगामी फळे, भाज्या पिकविण्याकडे शेतकरी वळू लागले आहेत. त्यातून दोन पैसे अधिकचे मिळविण्याचा त्यांचा प्रयत्नही यशस्वी होताना दिसत आहे.
याची यशोगाथा तुम्ही महान्यूज लाईव्हच्या येथील पोस्टवर अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेज व यु ट्यूबवरही पाहू शकता…
दौंड तालुक्यात अशाच एका सत्तरीतल्या तरण्याबांड शेतकऱ्याने मागील दोन वर्षांपासून दौंड तालुक्यासारख्या कमी पर्जन्यमानाच्या भागात चक्क इंद्रायणी भाताचे पिक घेण्यास सुरवात केली आहे. यंदा तर त्यांनी एका युवा शेतकऱ्याला बरोबर घेत त्यात बरीच मजल मारली आहे.
मूळचे हवेली जिल्ह्यातील रंगनाथ काटे हे ७० वर्षाचे शेतकरी आहेत. त्यांनी यंदा दौंड तालुक्यातील खडकी येथील संदीप काळे या शेतकऱ्याला बरोबर घेऊन इंद्रायणी भाताचे पिक घेतले आहे. काटे यांनी एक एकर क्षेत्रात तर काळे यांनी तीन एकर क्षेत्रात इंद्रायणीचा प्रयोग केला आहे.
सध्या हे भाताचे पिक चांगलेच तरारले आहे. मागील वर्षी रंगनाथ काटे यांना अर्ध्या एकर भाताच्या पिकातून सात पोती तांदूळ मिळाला होता. यावर्षी या दोघांकडे साडेतीन एकर इंद्रायणी तांदूळ पिकवला आहे. याची भाताची रोपे या दोघांनी स्थानिक ठिकाणीच तयार केली. कृत्रिम भातखाचरेही या शेतात दोघांनी केली. त्यासाठी ट्रॅक्टरद्वारे खाचणी केली.
या पिकासाठी त्यांना एकरी १० हजार रुपये खर्च आला आहे. त्यातून ४० ते ५० हजारांचे उत्पन्न मिळेल असा दोघांचाही अंदाज आहे. तांदळाच्या किंमती बऱ्यापैकी असल्याने भावात फार फरक पडणार नसल्याचे दोघांचे म्हणणे आहे. त्यातही उसासारख्या पिकाला दीड वर्षे थांबावे लागते, त्या तुलनेत भात काढल्यानंतर हरभरा किंवा कांद्याचे पिक घेता येत असल्याने दीड वर्षात तीन ते चार पिके घेता येत आहेत. त्यातून मिळणारे उत्पन्न उसालाही मागे टाकत असल्याने आम्ही हा पर्याय निवडल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
कारणे कोणतेही असोत, वेगळा प्रयोग करणाऱ्या या शेतकऱ्यांचे धाडस इतरही शेतकऱ्यांसाठी अनुकरणीय व प्रयोगशीलच आहे. दौंड तालुक्यात सध्या या भाताच्या पिकाचीच जोरात चर्चा आहे.