लक्ष्मण जगताप
बारामती
( बारामतीत अल्पवयीन मुलांकडून झालेल्या खुनासारख्या प्रकाराने सारे शहर हादरून गेले. कोणत्याही सुजाण नागरिकाला हादरवून टाकणारी ही घटना होती. याबाबतच एका बारामतीकर नागरिकाची प्रतिक्रिया सोबत देत आहोत. हा विषय खरोखरच फार गंभीर असून यावर सखोल विचारमंथनाची गरज आहे. त्यामुळे याबाबत वाचकांनी प्रतिक्रिया पाठविल्यास महान्यूज लाईव्हकडून त्याला प्रसिद्धी देण्यात येईल. कृपया आपल्या प्रतिक्रिया ९८८१०९८१३८ या व्हाटसएप नंबरवर पाठवाव्या हि विनंती. )
अलीकडील काळात अल्पवयीन मुलांकडून खून ,मारामा-या ,भांडणे,स्वतःच्या अपहरणाचा बनाव , यासारखे प्रकार घडण्याचे वाढलेले प्रमाण चिंताजनक आहे. दहा ते अठरा हा वयोगट शिक्षण घेण्याचा परंतु या वयोगटातील मुले रागाच्या भरात चुकीच्या गोष्टी करतात. हे खूप काळजी करण्यासारखे आहे. चोरी करताना प्रतिकार केला म्हणून एकट्या राहणाऱ्या वृद्ध आजीचा खून केला ही मागील काही दिवसात घडलेली घटना. अभ्यास करत नाही. म्हणून आई रागवली.. मायलेकीच्या भांडणात पंधरा वर्षाची मुलीने रागाच्या भरात आपल्या आईचा गळा आवळून खून केला .अभ्यासासाठी मामा रागवला म्हणून अपहरणाचा बनाव.
भांडण ,खून ,चोरी ,मारामारी ,अशा अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडतात. यामधील मुले ही अल्पवयीन असल्याचे आढळून येते.
अल्पवयीन शालेय मुले रागीट का बनत आहेत ? यात दोष कुणाचा. पालकांचा की मुलांचा ? शिक्षण व्यवस्थेचा की समाजाचा ? यावर गांभीर्याने विचार व्हायला हवा. मोबाईल ,लॕपटॉप,टिव्ही, टॕब इ. साधनांचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे.
विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवर क्राईम मालिका दाखविल्या जातात. अनेक चित्रपटात खून ,मारामारी ,बलात्कार आणि अश्लिल दृश्यांचा भडिमार केला जातो. अशी दृश्ये सतत बघितल्याने या वयोगटातील मुलांच्या मनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. आपणही असे करुन बघावे असा विचार त्यांच्या मनात येतो. मग त्याविषयी नियोजन केले जाते. अशी कृत्ये करणे वाईट आहे, यात धोके असतात याची जाणीव मुलांना होत नाही. चित्रपटातील नायकाला आदर्श मानण्यात मुलांना आनंद वाटतो. नायकाप्रमाणे आपणही खून ,मारामारी करायला मुलांचे मन उद्युक्त होते. परंतु मालिका ,चित्रपट हे मनोरंजनासाठी असतात . त्यातील खून मारामारी किंवा भडक दृश्ये कथानकाला आवश्यक म्हणून खोटीच चित्रित केलेली असतात हे मुलांच्या लक्षात येत नाही. अनुकरण करण्याकडे मुलांचा कल असतो. मग नको त्या घटना मुलांच्या हातून घडून जातात.
मुले कोणते कार्यक्रम पाहतात? किती वेळ पाहतात ? टिव्ही ,मोबाईल व यु-ट्युबवर काय पाहतात? खरंच मुलांना असे कार्यक्रम पाहणे गरजेचे असते का? वाईट गोष्टीचे अनुकरण करण्यास मुले आघाडीवर असतात.म्हणून मुलांना या वयात खूप जपायला हवे.
पालकांचा मुलांशी संवाद असला पाहिजे. दूरचित्रवाणी वाहिन्यांवर काय पाहावे ? काय पाहू नये ? हे मुलांना समजावून सांगायला हवे. अशा गोष्टी केवळ मनोरंजनासाठी असतात.यापलीकडे त्याकडे पाहू नये.हे त्यांच्या निदर्शनास आणून देणे पालक म्हणून आपली जबाबदारी आहे.मुलांच्या डोळ्यांना चांगले पाहायला मिळावे ,चांगले ऐकायला मिळावे यासाठी प्रयत्न करायला हवेत.
ही अल्पवयीन मुले गुन्हेगारी कृत्यांकडे वळणार नाहीत याकडे आपले लक्ष असणे महत्त्वाचे आहे.
मनाविरुद्ध घडले की मुलांना राग येतो. आई वडीलांनी अथवा मोठ्या माणसांनी काही सांगितले तरी मुलांना आवडत नाही. चिडचिडपणा व रागीटपणा वाढतो. रागाच्या भरात एखाद्याचा जीव घेण्यापर्यत या मुलांची मजल जाते. परिणामांची तमा न बाळगता मुले अशी हिंसक कृत्ये करतात हा समाजापुढील मोठा गहण प्रश्न आहे.
भावनांवर नियंत्रण कसे मिळवावे ? रागाला आवर कसा घालावा ? संयम कसा ठेवावा ? हे सगळ्याच मुलांना जमत नाही.
अनेकांच्या कौटुंबिक समस्या आणि अडचणी वेगवेगळ्या आहेत.अशा परिस्थितीत माझ्या पाल्याने उत्तम शिक्षण घेतले पाहिजे. त्याने विविध क्षेत्रात चांगले करिअर करावे यासाठी पालक प्रयत्न करत असतात. साहजिकच कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करण्याची अपेक्षा मुलांकडून ठेवली जाते. मुलांच्या मनाचा फारसा विचार केला जात नाही. त्याचा कल, त्याची आवड याकडे दुर्लक्ष केले जाते.
किशोरवयीन मुलांच्या शरीरात हार्मोन्समुळे अनेक बदल घडून येतात. या वयात मुले रागीट व चिडखोर बनतात. मोठ्या माणसांनी सांगितलेल्या गोष्टी स्वीकारण्याची त्यांची तयारी नसते. स्वतःच्या मनाप्रमाणे वागण्याकडे त्यांचा कल असतो.
अशा वेळी मुलांशी प्रेमाने संवाद साधला पाहिजे. त्यांच्या अडचणी जाणून घ्यायला हव्यात. सर्वात महत्त्वाचे त्यांना समजून घेतले पाहिजे. प्रत्येक वेळी रागवून चिडून उपयोग होत नसतो.. त्यांना ताण येईल , दडपण येईल असे वातावरण घरात असता कामा नये. आनंददायी आणि भयमुक्त वातावरणात मुलांची मानसिकता चांगली राहते. संयम ठेवून अडचणीच्या प्रसंगावर कशी मात करावी हे मुलांना शिकविणे आवश्यक आहे. यासाठी ध्यान ,प्राणायाम यांचा चांगला उपयोग होतो.
आज शिक्षणात कमालीची जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे. माझ्या पाल्याला प्रवेश कुठे मिळेल ? त्याच्या करिअरचे काय होईल ? असे असंख्य प्रश्न पालकांच्या मनाला सतावत असतात. मुलांनी सतत अभ्यास करावा अशी पालकांची इच्छा असते. ती पूर्ण करण्यास टाळाटाळ झाली की पालक मुलांना ओरडतात ,रागवतात. याचा मुलांना राग येतो. मुलांना हाताळताना त्यांच्या भावना , त्यांची मते यांचाही विचार केला पाहिजे.
मुलांची बुद्धिमत्ता ,क्षमता आणि कुवत पाहूनच आपण त्याला पुढे जाण्यास मार्गदर्शन करायला हवे. तरच पाल्य आणि पालक यांच्यामधील नाते मैत्रीचे ,मायेचे राहू शकेल आणि त्यातून अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या गुन्हेगारी कृत्यांना आळा बसू शकेल.