काही वर्षांपूर्वी ढापे चोरीला गेले होते..ते मिळवण्यासाठी त्यावेळी पुढार्यांच्या घराचे उंबरे झिजवले.. आताही तशीच गत होणार का..??
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर -इंदापूर तालुक्यातील निमसाखरपासून काही किलोमीटर अंतरावर सोलापूर जिल्ह्यातील पळसमंडळ नजीक असलेल्या नीरा नदीवरील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधारा भागात ठेवण्यात आलेले बंधाऱ्यासाठी आवश्यक असणारे 70 ढाप्यांची चोरी झाली आहे. या ढाप्यांची किंमत सुमारे 1 लाख 40 हजार रुपये आहे.
सुस्थितीत असणारे ढापे चोरी झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. दरम्यान ढापे चोरी झाल्याची तक्रार जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी वालचंदनगर पोलीस स्टेशनला दिली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही लोखंडी धापेंची चोरी झाली असताना ते ढापे मिळवण्यासाठी राजकारणी पुढार्यांच्या घरांचे उंबरे झिजवण्याची वेळ शेतकऱ्यावर आली होती. आजही तशीच परिस्थिती उद्भवल्याने आता शेतकऱ्यांना पुन्हा पुढाऱ्यांच्या दारात हेलपाटे मारून त्यांचे उंबरे झिजवण्याची वेळ येणार का ? असा सवाल या निमित्ताने पुढे आला आहे.
निमसाखर हे गाव सुमारे सहा हजार लोकसंख्या असलेले गाव असून या गावापासून केवळ अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर पळसमंडळ (जिल्हा सोलापूर ) नजीक कोल्हापूरी पद्धतीचा बंधारा आहे. या बंधारा भागांमध्ये नवी आणि जुनी मोठ्या प्रमाणावर लोखंडी ढापे ( पिना ) लोकांचा वावर कमी असलेल्या ठिकाणी टाकण्यात आली होती. यापुर्वीही याच भागात मोठ्या प्रमाणावर लोखंडी ढापे चोरी झाल्याचे प्रकार घडल्याचे या भागातील नागरिक सांगतात. हा बंधारा भागाचा परिसर सामाजिक वनीकरणाचा असुन नीट या परिसरात दुचाकी चालत नाही अशा भागात ही ढापे टाकण्यात आली होती.
गुरुवार दि.11 रोजी च्या मध्यरात्री अंधाराचा फायदा घेऊन सुमारे 70 लोखंडी चोरीला गेले. यासंदर्भात अधिकारी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्याचे या भागातील नागरीक सांगतात. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार अशा अडचणीच्या भागातून बंधाऱ्याची काढलेली लोखंडी सुस्थितीतील ढापे चोरीला गेल्यामुळे या भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. मग चांगल्या मजबूत स्थितीतील ही लोखंडी ढापे मागील काही वर्षांपूर्वी राजकारणांच्या घराचे उंबरे झिजवल्यानंतर उपलब्ध झाली होती.
जलसंपदा खात्याच्या तक्रारीनुसार वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी केली व आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे यासंदर्भात माहिती घेत परिसरातील सीसीटीव्ही तपासले. पाहणी केलेल्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार चोरी झालेल्या ठिकाणी चार चाकी वाहनाच्या चाकांचे व्रण आढळले असून ते पिकअप हे वाहन असावे असा प्राथमिक अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.
निमसाखर गावाजवळून निरा नदी वाहते. पळसमंडळ येथे या नदीवर बंधारा आहे. या ठिकाणी सुमारे 511 लोखंडी ढापे होती त्यापैकी 363 खराब तर उरलेल्या सुस्थितीतील लोखंडी ढाप्यांपैकी सुमारे 70 ढापे चोरीला गेले. नागरिकांच्या म्हणण्यानुसार एका ढाप्याचे वजन 50 किलोच्या आसपास असून सुमारे 1 लाख 40 हजार रुपयांचे खात्याचे नुकसान झाले आहे. या चोरीचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराप्पा लातूरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पीएसआय मिलींद मिठापल्ली करत आहेत. यावेळी सहाय्यक फौजदार निकम, हवालदार एस.एन.स्वामी उपस्थित होते.