विक्रम वरे – महान्यूज लाईव्ह
जेव्हा देशभर १३ ऑगस्टपासून तीन दिवस राष्ट्रध्वज उभारण्यासाठी तयारी सुरू असताना तिकडे बारामती तालुक्यातील बाबुर्डी गावातील खोरेवस्तीत १२ ऑगस्टच्या संध्याकाळी पाच वाजता गावातील सरपंच, उपसरपंचांच्या पतीसह गावातील युवा पदाधिकारी धावपळ करीत होते.. कोणी वीटा आणत होते.. कोणी सिमेंट.. कोणी वाळू तर कोणी दगड..! का?… महिला बाल विकास प्रकल्पाच्या एका महिला कर्मचाऱ्याने शेजारी वस्तीशाळेत ध्वजस्तंभ असतानाही अंगणवाडीपुढे पक्का बांधकामाचाच ध्वजस्तंभ हवा असा हट्ट धरला आणि साऱ्यांनीच कंबर कसली.. संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते १३ ऑगस्टच्या पहाटे १ वाजेपर्यंत सारे गवंड्याच्या हाताखाली राबले.. पण ध्वजस्तंभच उभारला..!
आझादीच्या अमृतमहोत्सवात सामान्यांना काय हवंय… त्याच्या गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक, वायरमन, स्वस्त धान्य दुकानदार, झालंच तर पंचायत समितीचा सदस्य, झेडपीचा सदस्य, बीडीओ, तहसीलदार यांच्याकडे एखादे काम घेऊन गेल्यास त्याने ते काम अगदी विनासायास, त्रास न देता पूर्ण करावे.. ये देश मेरा.. असं अभिमानाने म्हणण्याची त्याची उदंड मानसिकता व्हावी..! एवढंच ना? पण खरंच असं होतंय का? हे चित्र बदलायला हवे.. बारामती तालुक्यातील बाबुर्डी गावात काल मात्र हे एकीचे बळ पाहायला मिळाले..
बाबुर्डी गावाच्या हद्दीत खोरेवस्ती आहे. या खोरेवस्तीत एकाच ठिकाणी वस्तीशाळा व अंगणवाडी आहे. या वस्तीशाळेत फक्त चार मुले शिकतात.. तर अंगणवाडीत १० मुले..! या दोन्ही शाळा एकाशेजारी म्हणजे दोन गुंठ्याच्या क्षेत्रफळात आहेत. वस्तीशाळेत ध्वजस्तंभ आहे. तेथे दरवर्षी ध्वजवंदन होते. मात्र यंदा अंगणवाडीसमोरही स्वतंत्र ध्वजवंदन करायचा हट्ट महिला व बाल विकास प्रकल्पाच्या एका महिला कर्मचाऱ्याने धरला. गावकऱ्यांनी तिची समजूत काढताना ध्वजस्तंभ शेजारीच आहे, तेथे एकत्रित ध्वजवंदन करू असा सल्ला दिला. मात्र मी कारवाईच करेन असा विचित्र इशारा या कर्मचाऱ्याने दिल्यानंतर सुरवातीला गावकरी भडकले..
मात्र या कर्मचाऱ्याने अगदी गटविकास अधिकाऱ्याला देखील येथे ध्वजस्तंभच नाही असे सांगत आपली मागणी रेटली. त्यावर गटविकास अधिकाऱ्याने ग्रामसेवकालाही ध्वजस्तंभ उभारण्याची सूचना केली. मात्र अवघ्या चार तासांत ध्वजस्तंभ कसा उभारणार हा प्रश्न सर्वांपुढे पडला. अखेर त्या महिला कर्मचाऱ्याच्या आग्रहासाठी नव्हे तर देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवासाठी गावकऱ्यांनी कंबर कसली.
१२ ऑगस्ट … संध्याकाळचे पाच वाजले होते. मग सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांनी सहकाऱ्यांशी चर्चा केली आणि चला कामाला लागायचे असा सल्ला दिला. कमी वेळेत बांधकाम करण्यासाठी श्रीकांत बाचकर यांना विनंती केली. त्यांनी तयारी दाखवली. मात्र हाताखाली मजूर नाही असे म्हटल्यावर सगळ्या गावकऱ्यांनी आम्ही श्रमदान करू असे सांगत त्यांना बळ दिले. मग रात्री नऊ वाजेपर्यंत सारे साहित्य गोळा केले. उपसरपंचांच्या घराचे बांधकाम सुरू आहे, त्यांचे पती योगेश जगताप यांनी व सदस्य दत्तात्रेय ढोपरे यांनी तेथूनच विटा, वाळू, सिमेंट असे काही साहित्य गोळा केले. सर्व टीम रात्री 9 वाजता अंगणवाडीजवळ पोहोचली.
राहुल पोमणे आणि राकेश जाधव यांनी सिमेंट वाळू एकत्र तयार करून बांधकामाचा कच्चा माल तयार केला. सरपंच माऊली पोमणे यांनी बिगारी म्हणून काम करीत माल तयार करून गवंड्याच्या हाताखाली काम केले. उपसरपंचांचे पती योगेश जगताप, सदस्य दत्तात्रय ढोपरे, महिला सदस्यांचे पती गोविंद बाचकर आदींनी आवश्यक दगड, गोटे आणून दिले. मग लोखंडी खांब आणण्यात आला. त्याला रंगरंगोटी करण्यात आली.
अगदी मध्यरात्री बारा ते १३ ऑगस्ट रोजी पहाटे साडेबारा वाजेपर्यंत स्तंभ उभा राहिला. १३ ऑगस्ट रोजी सकाळी त्याच स्तंभावर ध्वजारोहण झाले. उपसरपंच पती योगेश जगताप यांनी विटा अन् वाळू उपलब्ध करून दिले तर सिद्धार्थ लव्हे यांनी सिमेंट उपलब्ध करून दिले, सगळे मटेरियल न्यायला गाडी उपलब्ध करून दिली राकेश जाधव यांनी, स्तंभ तयार करुन दिला विकास लव्हे यांनी…!
असा हट्ट कशासाठी? ही महिला कर्मचारी कोण?
दरम्यान या निमित्ताने ध्वजस्तंभ उभारल्याचे समाधान गावकऱ्यांना झाले. मात्र शेजारीच ध्वजस्तंभ असताना दुसरा आणि स्वतंत्र ध्वजस्तंभासाठी गावकऱ्यांवर दबाव आणणारी ही महिला कर्मचारी कोण? असा सवाल काल बारामती शहरातील नागरिकांनी उपस्थित केला. शिवाय ध्वजस्तंभ उभारला नाही, तर मी सर्वांवर कारवाई करेल असा दम या महिला कर्मचाऱ्याने कोणत्या आधारे दिला? दिला नेमके किती अधिकार आहेत? असा सवालही यानिमित्ताने विचारला जात आहे.
दरम्यान ही कर्मचारी महिला अंगणवाडीच्या सेविकांना दमबाजी करते अशी माहिती आम्हाला मिळाल्याचे गावचे सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांनी दिली. अर्थात ध्वजस्तंभ उभारणे हे आमचे कर्तव्य होते, ते आम्ही कोणाच्या दबावाखाली नाही, तर स्वयंस्फूर्तीने पार पाडले, ते श्रमदान व लोकवर्गणीतून झाले, मात्र छोट्या गावांकडे निधी नसतो, त्यातही अगदी चार तासांत असे काम करणे एरवी शक्य होत नाही, हे सामूहिक श्रमदानाने शक्य झाले, अशावेळी वाईट एवढेच वाटते की, या महिला कर्मचाऱ्याने दोन गुंठ्यातच असलेल्या वस्तीशाळेत ध्वजस्तंभ आहे अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली नाही, एकतर्फी माहिती दिली. त्यामुळे गावकऱ्यांनाच दमात घेणाऱ्या या महिला कर्मचाऱ्याची आम्ही वरिष्ठ स्तरावर चौकशीची मागणी करणार आहोत, ध्वजस्तंभ पक्क्या बांधकामाचाच असावा असे कोणत्या नियमात आहे याचीही विचारणा करणार आहोत अशी माहिती पोमणे यांनी दिली.