बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती नगरपरिषदेच्या 245 कोटींच्या विकासकामांच्या मंजुरीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ब्रेक दिला आहे, याचा बारामतीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संताप व्यक्त करत आहेत, मात्र भारतीय जनता पक्षाने त्याचे स्वागत केले आहे. भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सहसंयोजक अॅड. नितीन भामे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या निर्णयाचे स्वागत करताना भरकटलेला विकास रुळावर आणण्यासाठी शिंदे सरकारने घेतलेला निर्णयाचे स्वागत असल्याचे म्हटले आहे.
बारामतीतील जनहिताच्या कोणत्याही विकास कामावर परिणाम होणार नाही याची काळजी शिंदे सरकार नक्की घेईल, मात्र नवे पालकमंत्री नियुक्त झाल्यानंतर बारामती जेवढे प्रकल्प झाले आहेत किंवा सुरू झाले आहेत, त्यातील भ्रष्टाचारासंदर्भात आम्ही तक्रारी दाखल करणार आहोत. बारामतीत या अडीच वर्षाच्या काळात केवळ ठेकेदारच जगवले गेले. विनाकारण जनतेच्या पैशाचा अपव्यय केला गेला. अनेक ठिकाणी सुस्थितीत असलेली विकासकामे तोडून, पुन्हा त्या ठिकाणी नव्याने कामे करण्याचा घाट घातला व मनमानी दाखवली गेली आहे अशी टीका भामे यांनी केली आहे.
भामे म्हणाले की,नियोजनशुन्य, अकल्पक विकास आराखडे तसेच जनतेच्या पैशाचा अपव्यय करून केवळ बगलबच्चे व ठेकेदार जगवण्यासाठी हुकूमशाही पद्धतीने पवारांकडून बारामतीच्या तथाकथित विकासाचा बागूलबुवा उभा करून कायमच जनतेला भ्रमीत करण्याचं पाप केलेले आहे. आता ह्या प्रकारे भरकटलेला विकास माथी मारण्याचे काम बारामतीची जनता सहन करणार नाही, याचा जाब पवारांना द्यावाच लागेल.
बारामतीतील विकास कामात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत नविन पालक मंत्री नियुक्त झाल्यानंतर पक्ष पातळीवर तक्रार केली जाईल तसेच ज्या ठिकाणी जनतेच्या हिताची विकास कामे आवश्यक आहेत तिथे निश्चितच काम सुरू करण्याबाबत विनंती केली जाईल.
परंतु ठेकेदार व बगलबच्च्यांच्या आट्टाहासाने जनतेच्या माथी मारले गेलेले प्रकल्प बाबत निश्चितच विरोध केला जाईल. कारण सर्व सामान्य जनतेला त्या कामाचं काहीच कौतुक नाही. अपुर्ण पाणी पुरवठा योजना, शहरातील स्वच्छतेचा कायमचाच प्रश्न, कचरा डेपो प्रश्न, अंतर्गत रस्त्यांची कायमच डागडूजी करावी लागणे, विकास कामांबाबत ढिसाळ नियोजन, पुर्वनियोजनाचा आभाव, झालेली विकास कामे पुन्हा तोडण्याचा निर्णय असे अनेक अविचारी निर्णय मागील अडीच वर्षाच्या काळात झालेत, परंतु केवळ पाशवी बहुमताच्या जोरावर बारामतीत जनतेची मुस्काटदाबी करून घेतेलेले निर्णय जनतेला मान्य नाहीत असे भामे यांनी म्हटले आहे.