भवानीनगर येथे पेन्शन वाढीच्या मागणीसाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मेळावा
भवानीनगर : महान्यूज लाईव्ह
राज्यातील असंघटित क्षेत्रातील कामगारांची स्थिती भयावह आहे. विशेषतः संघटित क्षेत्रात देखील साखर कामगार किंवा इतर ठिकाणच्या कामगार संघटना मधील जे कामगार निवृत्त होतात, त्यांना अतिशय तुटपुंजे निवृत्तीवेतन मिळते. या निवृत्तीवेतनाची दखल केंद्र सरकारने घ्यावी, यासाठी अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. मात्र त्याला आत्तापर्यंत गांभीर्याने घेतलेले नाही असे मत महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष सुभाषराव पोखरकर यांनी भवानीनगर येथे व्यक्त केले.
भवानीनगर येथील भवानीमाता मंदिरात येथे ई.पी.एस सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा पेन्शन वाढ मागणीसाठी मान्यवरांच्या उपस्थितीत मेळावा झाला. यावेळी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष सुभाषराव पोखरकर बोलत होते.
ते म्हणाले की, 67 लाख औद्योगिक, सार्वजनिक, सहकारी व इतर उद्योगधंद्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी त्यांच्या त्या- त्या सेवाकाळात ई.पी.एस 95 पेन्शन फंडांमध्ये 417 रुपये, 541 रुपये, 1250 रुपये असे अंशदान दिले असून त्यांना सेवानिवृत्तीनंतर त्यावर अत्यंत तुटपुंजी पेन्शन मिळते. काहींचा घर खर्च तर सोडाच, परंतु औषधपाणी देखील भागणे अवघड आहे.
त्यांची दयनीय व मरणासन्न अवस्था निर्माण झालेली आहे. या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन वाढीसाठी राष्ट्रीय संघर्ष समिती गेली 6 वर्षांपासून संघर्ष करीत आहे. वृद्ध पेन्शनर हितचिंतकांची खासदार हेमा मालिनी यांच्यासमवेत प्रधानमंत्री व राष्ट्रीय संघर्ष समिती राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत, संघर्ष समितीचे सदस्य यांच्यामध्ये पेन्शन वाढीबाबत बैठक झाली.
समितीने पेन्शन वाढ कशी योग्य आहे हे प्रधानमंत्री यांना पटवून दिले. त्यावर प्रधानमंत्री यांनी देखील पेन्शन वाढीचे संबंधित मंत्र्यांना निर्देश दिले. त्यानुसार वित्त सचिव टी. सोमनाथन व समिती सदस्यांमध्ये यांच्यामध्ये बैठक झाली. त्यांनी देखील पेन्शन वाढ देण्यास काहीच हरकत नसल्याचे सांगितले व लवकरच कार्यवाही करीत असल्याचे सांगितले.
मात्र या घटनेला एक-दिड वर्ष उलटून गेले तरीदेखील अजूनही पेन्शनमध्ये वाढ किंवा कसलाही आदेश निघालेला नाही. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी संभ्रमावस्थेत आहेत. सेवानिवृत्त कर्मचारी यांचा संयम सुटत चाललेला आहे. आता त्वरित एक महिन्याचे आत 7500 रुपये अधिक महागाई भत्ता इतकी कमीत कमी पेन्शन वाढीची घोषणा करणेत यावी यासाठी संसदेत बजेटमध्ये तरतूद करावी लागली तरी ती करावी व त्यासाठी संसदेत बिल पास करण्यात यावे. वृद्ध सेवानिवृत्त कर्मचारी तसेच त्यांच्या पती-पत्नीला मोफत मेडिकल सुविधा पुरविण्यात याव्यात अशी मागणीही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
जर एक महिन्याच्या आत केंद्र सरकारने ई.पी.एस.95 सेवानिवृत्त, कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ केली नाही, तर 9 ऑगस्ट क्रांती दिनी दिल्लीमध्ये दोन लाख सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सत्याग्रह आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी सभेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे उपाध्यक्ष युवराज रणवरे, महाराष्ट्र राज्य समन्वयक डी. एम. पाटील, बारामती तालुका अध्यक्ष प्रताप सातपुते, अजित घाडगे, जयसिंग जांभले यांची कामगार समस्या व पेन्शन वाढीबाबत भाषणे झाली
याप्रसंगी कार्यक्रमाचे संयोजक व महाराष्ट्र राज्य गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे पुणे जिल्हा (ग्रामीण)चे अध्यक्ष प्रकाश शिंदे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष भगवंत वाळके, पुणे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव चोपडे, बारामती तालुका सचिव शशिकांत शहा, सहसचिव वसंत पैठणकर, दौंड तालुका अध्यक्ष मुलाणी, बाळासो तावरे, बाळासाहेब जाधव, बाळासो डाळे, बाळासाहेब घुले, गोविंदराव घुले, दादासाहेब थोरात, माजी कामगार संचालक सतीश गावडे, माजी ग्रामपंचायत सदस्य शरद कांबळे, शिवाजी खंडागळे ,सिकंदर पठाण तसेच वालचंदनगर शेती महामंडळ, साखर कारखाने, एसटी महामंडळ, वीज महामंडळ,सहकारी बॅंका व इतर सहकारी संस्थांतील अनेक सेवानिवृत्त कामगार, महिला भगिनी उपस्थित होते.
याप्रसंगी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या रक्ताच्या स्वाक्षरीने पंतप्रधानांना पेन्शन वाढ साठीचे पत्र पाठवण्याचे ठरले याची सुरुवात म्हणून अनेक कामगारांनी आपल्या रक्ताचे बोटाचे ठसे पंतप्रधानांना निवेदन द्यावयाच्या कागदावर उमटविले. याप्रसंगी प्रकाश शिंदे यांची संघर्ष समितीच्या इंदापूर तालुकाध्यक्षपदी तर अंकुश काळे यांची उपाध्यक्षपदी तर भालचंद्र घुले यांची सचिव म्हणून निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार संयोजक प्रकाश शिंदे यांनी मानले.