घनश्याम केळकर
महान्यूज लाईव्ह विशेष
खर तर मिडियात काम करणाऱ्या लोकांसाठी, विशेषत: बातमीदारांसाठी ‘ बातम्या ‘ मिळणे हा आनंदाचा भाग असतो. कोणत्याही वृत्तपत्रासाठी काम करणारा बातमीदार हा जास्तीत जास्त बातम्या मिळविण्यासाठी धडपडताना दिसतो. पण गेल्या आठवड्यात बातम्यांचा असा पाऊस कोसळला की, यातले घ्यावे तरी किती अशा प्रश्न पडावा. आणि बातम्या तरी कशा तर यातल्या एका एका बातमीवर आठवडा पंधरवडा सहज काढता आला असता. पण अचानक पूर यावा आणि पाऊसाची वाट पाहत असणारे सगळे शेतच वाहून घेऊन जावा अशी अवस्था अनेक बातमीदारांची झाली.
समोर घडत असलेला घटनाक्रम पाहून सिंहासन चित्रपटातील पत्रकार ‘दिगू टिपणीस’ सारखी अक्षरश: वेड लागावे अशी डोक्याची बधीर अवस्थाही काही बातमीदारांनी अनुभवली.
गेल्या मंगळवारी सकाळी ज्यावेळी महाराष्ट्रभरातून संताच्या पालख्या पंढरपूरकडे वाटचाल करू लागल्या होत्या, त्यावेळी बहुतेक सर्व बातामीदारांनी आता आषाढीपर्यंत विठ्ठलभक्तीत रंगून जाण्यासाठी मनाची तयारी केली होती. आता वारी, संतांच्या पालख्या, आगळ्या वेगळ्या वारकऱ्यांच्या कथा, परंपरा, भक्ती आणि अभंगाच्या ओळीची बरसात सगळ्या मिडियातून होणार हे सगळ्यांनीच गृहीत धरले होते. पण त्यानंतर आलेल्या बातमीने पंढरपूरच्या वारीला सगळ्या माध्यमातून जवळपास हद्दपारच केले. सत्ताकारणाचे बळ भक्तीला वरचढ ठरले.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांनी मंगळवारी पहाटे पहाटे सूरत गाठली. काय घडते आहे याचा आदमास घेण्यात मिडिया दिवसभर गुंतून राहिला, तर पुढच्याच दिवशी या सर्वांनी सूरत सोडून २५०० किमीवरची गुवाहाटी गाठली. मग पुढचे सहा सात दिवस सुरु झाला एक ‘ सत्तेसाठी वाट्टेल ते ‘ चा नेहमीचा निगरगट्ट प्रयोग.
या आठवड्यात काय काय घडले नाही. सत्तेसाठीची ही चढाओढ सुरुच होती. राजकीय आणि कायदेशीर रस्सीखेच चाललेली होती. वर्षा सोडून मातोश्रीवर गेलेले उद्धव ठाकरे आता राजीनामाच देतील असे वाटत असताना शरद पवारांच्या सल्ल्याने पुन्हा लढाईसाठी उभे राहिले होते. दुसरीकडे संताच्या पालख्या ऊन आणि कधीकधी पडणारा पाऊन झेलत पंढरपूराकडे चालतच होत्या. साऱ्या राज्यात शेतकरी आभाळाकडे डोळे लाऊन आता हा बाबा केव्हा येतोय याची वाट पहात बसला होता. ‘अग्नीपथ ‘ केव्हाच ‘ आऊट ऑफ मिडिया ‘ झाले होते. साऱ्या देशातील राजकारणाचे पंडित महाराष्ट्राच्या या घडामोडीत नेमका हात कुणाला याच शोध घेत आपला मेंदू बधीर करून घेत होते. नुपुर शर्माही केव्हाच मिडियातून बाहेर पडली होती, पण उदयपूरमध्ये एका टेलरच्या झालेल्या निघृण खूनानंतर ती पुन्हा मिडियाच्या लाईमलाईटमध्ये आली. याच आठवड्यात औरंगाबादचे ‘ संभाजीनगर ‘ उस्मानाबादचे ‘ धाराशिव ‘ आणि नवी मुंबई विमानतळाचे ‘ दि.बा.पाटील ‘ असे नामकरण झाले.
बातम्यांच्या या पूराने माध्यमांचे जे नुकसान झाले ते आता कधी भरून येणार आहे का ? किती तरी अग्रलेख लिहायचेच राहून गेले. यातच्या एका एका बातमीवर पाच पाच दहा दहा चर्चासत्रांचे दळण दळता आले असते. एकाच बातमीचा रवंथ करत दोन चार दिवस निघाले असते. पण आता काय करणार? बातम्यांच्या या पूराने सगळेच धूवून नेले.
‘ काय ते डोंगार, काय ती झाडी, काय हाटेल, एकदम ओक्केमध्ये आहे.’ या डॉयलॉग आता कुठे गाजू लागला होता. त्यावरचे मिम्स तयार करून कलाकार थोडी विश्रांती घेतच होते, तोवर ‘ मेरा पानी उतरता देख मेरे किनारेपे घर मत बसा लेना, मै समंदर हूं, लौटके वापस आ जाऊंगा’ हा जुना डॉयलॉग पुन्हा धुमाकूळ घालू लागला. ‘ मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन ‘ चे बॅनर रस्तोरस्ती लागू लागले. जमाना ‘फास्ट’ झाला आहे हे खरे, पण इतका फास्ट की काल मुख्यमंत्र्याच्या सोबत असणारा आणि तुमच्यासाठी मी जीवही देईन म्हणणारा दुसऱ्या दिवशी थेट ‘ गुवाहाटीत’ दिसावा. आपल्या आयुष्याचे फास्ट फॉरवर्ड बटन कुणीतरी दाबून धरले आहे, आणि या वेगाने आपण भोवंडून जात आहोत अशी अवस्था या आठवड्यात माध्यमकर्मींनी अनुभवली.
त्यातही वरताण झालेल्या ‘ केमिकल लोच्या ‘ ने तर असा वात आणला की काही विचारू नका. कोण कुणाच्या बाजूने आहे, कुणाचा कशात हात आहे, याचा ऐवढा गोंधळ उडाला की बास. ‘ निष्ठा ‘ हा शब्द इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांनी उच्चारला की त्याच्या अर्थाबद्दल लोकांचे गैरसमज होऊ लागले. निष्ठा एकनाथ शिंदेंची, निष्ठा उद्धव ठाकरेंची, निष्ठा संजय राऊतांची. तशीच निष्ठा बंडखोर आमदारांची, भाजपाची, शरद पवार आणि अजित पवारांची. आणि निष्ठा भाजपाची आणि निष्ठा राज्यपालांची. आघाडीची निष्ठा, राज्याची निष्ठा आणि हिंदुत्वाची निष्ठा. राज्याची आणि देशाची निष्ठा. एकाच उच्चाराच्या या सगळ्या निष्ठांनी इतका गोंधळ उडवला की निष्ठा हा शब्द ‘ विष्ठे ‘ सारखा दररोज धुवून टाकल्यासारखा वाटू लागला.
आता आनंद कुणाबद्दल मानावा आणि दु:ख कुणासाठी करावे. हातातोंडात आलेला अडीच वर्षापूर्वी हिरावलेला घास पुन्हा मिळत असलेल्या देवेंद्रांबद्दल आनंद व्यक्त करावा का. जे कालपर्यंत आपल्यासोबत होते, ते आज अचानक आपल्याविरोधात उभे राहिलेले पाहण्याची वेळ आलेल्या उद्धवांबद्दल दु:ख व्यक्त करावे. महाराष्ट्राच्या राजकारणाचे चाणक्य म्हणून ज्यांचा अडीच वर्षापासून उदो उदो चालला होता, त्या शरद पवारांच्या राजकारणाला पडलेली धोबीपछाड पाहून आनंदाचे भरते यावे, की या वयात त्यांच्या पदरी पडत असलेले अपयशही अतीशय सहजपणे पचविण्याच्या त्यांच्या वृत्तीबद्दल आनंद व्यक्त करावा. हिंदूत्वाची साथ दिली म्हणून बंडखोरांची बाजू घ्यावी, का सत्तेसाठी पक्ष फोडला म्हणून त्यांचा राग राग करावा.
आणि त्या बिचाऱ्या एकनाथ खडसेंनी काय करावे. विधानपरिषद जिंकल्याचा गुलाल अजून धुतलाही नाही, काही दिवसात मंत्रीपद मिळण्याची चाहूल एका झुळुकीसाठी सुखद गारवा आणत होती. तोवर एकदम हे वादळ आहे. आता ‘ गड आला पण सिंह गेला ‘ अशी अवस्था झालेल्या एकनाथभाऊंनी कशाचा आनंद मानावा आणि दु:ख कशाचे करावे.
सत्तेचा सारीपाट कसाही बदलतो, केवळ सत्तेचाच काय सगळ्या जगाचा सारीपाटावर असे काही बदल घडतात की आपण आ वासून बघतच रहावे. पंचवीस वर्षाची भागीदारी एक दिवस ‘ सडते. ‘ अडीच वर्षे सत्ता उपभोगल्यावर एक दिवस ‘ हिंदुत्वा’ आठवण सतावू लागते. सत्तेसाठी अखंड ‘ वाटाघाटी ‘ करणारे अचानक बाहेरून पाठिंब्याच्या गोष्टी करू लागतात.
दुसरीकडे काहींच्या मागची ईडीची पिडा अचानक थांबते. कुणा सरनाईकांना रात्रीची शांत झोप लागायला लागते. ही ईडीची पिडा जर हटवायची असेल तर भाजपाच्या शनीवरच तेल ओतायला पाहिजे, हे अध्यात्म आता महाराष्ट्रातल्या ३९ जणांना तरी चांगले कळालेले आहे. पण पिडा केवळ ईडीचीच नसते, कुणा कडूंच्या मागे लागलेला कागदवरचा रस्ताही अचानक दिसेनासा होतो.
आणी काय काय आणि किती किती सांगावे. तुम्ही इथपर्यंत वाचत आला असाल तर कदाचित वाट पहात असाल की आता संपवा एकदा. या सगळ्याचा सारांश सांगा एकदा आणि संपवा. पण आता सांगायचे तरी काय? तुम्ही सिंहासन पिक्चर पाहिलाय काय? त्यातला तो बातमीदार दिगू टिपणीस ? त्या चित्रपटातला सगळा सत्तेचा खेळ पाहून अखेर त्याला वेड लागते. मुंबईच्या मरिन ड्राईव्हवर तो वेडा होऊन फिरायला लागतो.
असे अनेक वेडे झाले तरी सत्तेचा खेळ काही थांबला नाही, तेव्हाही नाही आणी आताही नाही. शेवटी आपण सामान्य माणसे. आपण फक्त सगळा खेळ बघत रहायचा आणि काय. शेवट एवढेच.