सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
समाधानी आयुष्य जगण्यासाठी कौटुंबिक किंवा इतर वाद-विवाद टाळणे व झाल्यास ते तात्काळ मिटवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त सेशन न्यायाधीश डी.डी.कांबळे यांनी येथे केले.
राष्ट्रीय व राज्य विधी सेवा समितीच्या वतीने इंदापूर येथील सह दिवाणी व फौजदारी न्यायालयामार्फत शहरातील सरस्वतीनगर येथे कायदे विषयक मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून कांबळे बोलत होते.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मुख्य न्यायाधीश प्रकाश पाटील, सह दिवाणी न्यायाधीश स्वानंदी वाडगावकर, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश के.सि.कलाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व मुख्य व्यक्ते श्री डी. डी.कांबळे यांनी अध्यात्म व न्याय व्यवस्था यांची सांगड घातली. आपल्या भागातील, कुटुंबातील वादविवाद सामोपचाराने मिटवले तर आपला वेळ व पैसा तर वाचतोच तसेच मानसिक ताण ही निर्माण होत नाही. त्यामुळेच समाधानी आयुष्य जगण्यासाठी वादविवाद न करणे व तात्काळ मिटवणे गरजेचे आहे.
ॲड.बी.के.कडाळे यांनी बाल मजुरी कायदा व बालकांचे शिक्षणाचे अधिकार ह्याविषयी मार्गदर्शन केले. तर ॲड. मनीषा आदलिंग यांनी महिलांच्या विषयक कायदे व त्यांचे अधिकार ह्या विषयी मार्गदर्शन केले.
इंदापूर वकील संघटनेचे माजी अध्यक्ष एम.एस. चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन ॲड.आशुतोष भोसले यांनी केले. आभार ॲड. रवींद्र शेळके यांनी मानले. कार्यक्रमास सर्व वकील बंधू व शेकडो नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.