सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
मृग नक्षत्राचे आगमन होताच पहिल्याच पावसात वादळी वाऱ्याचा माऱ्यामुळे इंदापूर तालुक्यातील काही भागातील घरांच्या पडझडींसह फळपिके, विद्युत खांब, जनावरांच्या गोठ्यांचे, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागात सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच झालेल्या सर्व नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
गिरवी, टणू, नरसिंहपूर, पिंपरी बुद्रुक, गोंदी, ओझरे आदी भागात वादळी वाऱ्यामुळे केळी, डाळिंब, ऊस, पपई, पेरू पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर विद्युत खांब, गोठ्या वरील व घरावरील पत्रे, शेडचे मोठे नुकसान झाले आहे.
गिरवी ( ता. इंदापूर ) येथे वादळी वारे व पावसामुळे नुकसान झालेल्या केळीची पाहणी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली. यावेळी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश शिंदे, युवकचे प्रदेश सरचिटणीस संग्रामसिंह पाटील, रोहयोचे तालुका अध्यक्ष श्रीकांत बोडके, युवकचे तालुका सरचिटणीस नागेश गायकवाड, पांडुरंग डिसले, दादासाहेब क्षिरसागर, दिपक क्षिरसागर आदि मान्यवर उपस्थित होते.
राज्यमंत्री भरणे पुढे म्हणाले, इंदापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने झालेल्या नुकसानींचे पंचनामे युद्धपातळीवर तातडीने करून घेण्यात यावेत. तालुक्यात मृग नक्षत्राच्या पहिल्याच पावसात वादळी वाऱ्याचा माऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने युद्धपातळीवर करून घ्यावेत. पंचनाम्यातून कोणीही राहता कामा नये. प्रशासनातील सर्व विभागाच्या प्रमुखांनी बारकाईने लक्ष देऊन नुकसानीचे पंचनामे करून घ्यावेत तसेच विद्युत खांबांचे उभारणी तातडीने करून वीज पुरवठा सुरळीत करावा असे आदेश त्यांनी दिले.
दरम्यान तहसीलदार श्रीकांत पाटील यांना भ्रमण दूरध्वनीद्वारे विचारणा केली असता नुकसान झालेल्यांचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून युद्धपातळीवर ते काम पूर्ण करण्यात येईल. तसेच शासनास अहवाल सादर करण्यात येईल असे सांगितले.