नाशिक : महान्यूज लाईव्ह
इगतपुरी तालुक्यातील अधरवड येथील कातकरी वस्तीत एका २० वर्षाच्या तरुणीची जमावाकडून हत्या करण्यात आली असून या वस्तीतील तीन घरेही जाळून टाकण्यात आली आहेत. शनिवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेचे नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रात खळबळ माजली आहे.
आदिवासी समाजातील १० ते २० टोळक्याने हा प्रकार केला असून हे सर्वजण बारशिंगवे भागातील असल्याची माहिती आहे. जमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. अधरवड येथील वस्तीत शरद महादू वाघ हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांचा बारशिंगवे येथील आदिवासी व्यक्तींशी जमिनीचा वाद आहे. शुक्रवारी दुपारी या प्रकरणी बारशिंगवे भागातील ४० ते ५० जणांचे टोळके लाठ्याकाठ्या आणि दांडकी घेऊन कातकरी वस्तीत आले होते. त्यावेळी स्थानिक पोलीस पाटील आणि रहिवाश्यांनी मध्यस्थी करून वाद मिटवला होता.
परंतू शनिवारी पहाटे टोळक्यातील १५ ते २० जण पुन्हा येथे आले. शरद वाघ यांच्यावर वार करत असताना त्यांची मेहुणी लक्ष्मी ही सोडविण्यासाठी मध्ये पडली. पण तिच्यावरच वर्मी घाव लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या टोळक्याने शरद महादू वाघ,शंकर ज्ञानेश्वर वाघ आणि अलका संजू वाघ या तीन कुटुंबांची घरे जाळून टाकली. हे दोन्ही गट आदिवासी समाजातील आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसदल घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु करण्यात आला आहे. परंतू घडलेला प्रकारामुळे परिसरात घबराट पसरली आहे.