मुंबई : महान्यूज लाईव्ह
लग्न करायचे असले तर दोन व्यक्ती लागतात. पण गुजरातच्या क्षमा बिंदूच्या लग्नात एकच व्यक्ती होती. ती व्यक्ती म्हणजे ती स्वत:. मात्र देशभरातून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर तिने ठरलेल्या तारखेच्या ३ दिवस अगोदरच हे लग्न उरकले.
हा एक ऐतिहासिक आणि खास विवाह सोहळा होता. या लग्नादरम्यान हळदी – कुंकवाचा विधी झाला आणि मेहेंदीही झाली. सगळे हिंदू रितीरिवाजही पार पडले. मात्र या लग्नात ना नवरा मुलगा होता, ना लग्न लावणारा कोणी पंडित होता. कुटुंबातील जवळच्या व्यक्ती आणि काही खास मित्रांच्या उपस्थितीत हे लग्न झाले.
हे एक सोलो लग्न आहे. स्व – विवाह म्हणजे स्वत:साठी आणि स्वत:वर बिनशर्त प्रेम करण्याची वचनबद्धता आहे. सामान्यपणे लोक प्रेम असलेल्या व्यक्तीशी लग्न करतात. माझे स्वत:वर प्रेम आहे, म्हणून मी स्वत:शीच लग्न केले आहे, असे क्षमाने सांगितले. जगात अशा प्रकारे काही लग्ने झाल्याची उदाहरणे आहेत. पण भारतातील मात्र हे पहिलेच लग्न आहे.
मात्र या लग्नाला देशभरातून जोरदार विरोध झाला. ज्यावेळी क्षमाने आपला आपल्या लग्नाचा निर्णय जाहीर केला, त्यावेळी देशभरातून या निर्णयाला जोरदार विरोध झाला. विशेषत: हिंदुत्ववाद्यांनी या लग्नाला प्रखर विरोध केला. हे लग्न हिंदू धर्माविरोधात आहे, अशा लग्नामुळे हिंदूंची लोकसंख्या कमी होईल अशी अनेक कारणे या विरोधामागे होती.
या विरोधामुळेच क्षमाला कोणत्याही मंदिरात लग्न करण्याचा विचार सोडून द्यावा लागला. तिचे आई वडील खुल्या विचाराचे आहेत. तिच्या निर्णयाला त्यांचाही पाठिंबा आहे. ते या लग्नात उपस्थित होते. आता लग्नानंतर ती ‘ हनिमून ‘ ला गोव्याला जाणार आहे.