बारामती : महान्यूज लाईव्ह
सोलापूरच्या पालकमंत्र्यांसंदर्भात असलेल्या कथित तक्रारीवरून पत्रकारांनी आज अजित पवार यांना छेडले असता, पवार यांनी तो अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे, सोलापूरचा पालकमंत्री बदलायचा की नाही ते मुख्यमंत्री ठरवतील अशा शब्दात हा प्रश्न फेटाळून लावला.
आज बारामतीत अजित पवार यांना पत्रकारांनी या संदर्भात विचारले असता पवार म्हणाले, पालकमंत्री नेमायचे अधिकार हे सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचे असतात. या संदर्भात जो काही निर्णय आहे तो मुख्यमंत्री घेतील.
चार दिवसांपूर्वीच सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील गोविंदबाग येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन सोलापुरातील परिस्थितीची कल्पना श्री पवार यांना दिली होती. त्याचबरोबर संघटनात्मक बांधणी संदर्भात दत्तात्रय भरणे यांच्याविषयी असलेल्या तक्रारीही या पदाधिकाऱ्यांनी पवार यांच्या कानावर घातल्या होत्या.
दुसरीकडे उजनीच्या पाण्यावरून सोलापूर मध्ये वेगवेगळी कारणे सांगत विरोधकांनी राष्ट्रवादी विरोधात रान पेटवले आहे. त्याचा फटका पक्षीय पातळीवर जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिकांच्या निवडणुकांवर बसू शकतो अशी भीती देखील या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती.
गेल्या चार ते पाच दिवसापासून सोलापुरात लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेवरून राष्ट्रवादीला लक्ष्य करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसने देखील काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावरून पवार यांना विचारले असता, पवार यांनी माझ्याकडे या योजनेची सर्व कागदपत्रे आहेत. ही योजना जुनी आहे. यासंदर्भात अधिक विस्ताराने जलसंपदा मंत्री जयंत पाटील सांगू शकतील, परंतु सर्वांनी लक्षात घ्यावे की, ही योजना जुनी आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.