घनश्याम केळकर
महान्यूज लाईव्ह विशेष
राज ठाकरेंच्या कालच्या भाषणानंतर अनेक विषयांवर चर्चा रंगली. लोकमान्य टिळकांपासून मलिक अंबरच्या इतिहासापर्यंत पत्रकार परिषदा रंगल्या. पण खरे पाहता जिथे आग लागायला पाहिजे होती तिथे ती तितकीशी लागली नाही. याउलट काही भरवशाच्या गड्यांच्या प्रतिक्रियाही अनपेक्षित आल्या आहेत.
या भाषणानंतर एएमआयएमचे महाराष्ट्रातील नेते खासदार इम्तियाज जलील आणि ब्राम्हण समाजाचे स्वयंघोषित नेते आनंद दवे यांच्या प्रतिक्रिया तशा अनपेक्षित होत्या. राज ठाकरेंना हे अपेक्षित नसावे. एएमआयएम स्वत:ला देशातील मुस्लिमांची तारणहार मानते. त्या पक्षाची ‘ अरे ला कारे ‘ अशी भुमिका अपेक्षित होती. परंतू राज ठाकरे पेटवू पाहत असलेल्या आगीत त्यांच्या प्रतिक्रियेने चक्क पाणी ओतल्यासारखे झाले.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आम्हाला मान्य आहे. कोणाला पटो अथवा न पटो, तो निकाल सगळ्यांनी मान्यच करायला हवा, असे म्हणत इम्तियाज जलील यांनी राज ठाकरेंच्या विरोधात प्रक्षोभक बोलणे टाळले आहे. त्यांच्या पक्षाचे प्रमुख औवेसुद्दीन ओेवेसी भडक भाषा वापरण्याबाबत प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील या विषयात त्यांचीही भाषा अत्यंत नरम आहे. राज ठाकरेंना कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका असे त्यांनी फर्मानच काढले आहे. त्यांच्या या पावित्र्याने महाराष्ट्र पेटवून त्यात आपली पोळी भाजण्याच्या ‘ राज ‘ कारणाला मात्र चांगलाच धक्का बसेल असे दिसते आहे.
दुसरीकडे ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी यांनी तर राज ठाकरेंनाच आरसा दाखवला आहे. आनंद दवेंनी केलेले व्यक्तव्य जेवढे स्वागतार्ह आहे, तेवढेच अनपेक्षित आहे. भोंगे उतरविण्याच्या या कार्यक्रमाने सर्वाधिक नुकसान हिंदुत्वाचेच होईल असे आनंद दवे म्हणाले आहेत.
‘ रस्त्यावरच्या नमाजाला बंदी घातली तर रस्त्यावरच्या गणपतीच्या मांडवाचे काय ? गावाच्या जत्रा, उरुस, ग्रामदैवत यात्रा, गणपतीच्या मिरवणूका, नवरात्री, शिवजयंती, संभाजी महाराज जयंती, बाबाासाहेब आंबेडकर जयंती, प्रत्येक जातीच्या महापुरुषांचे दिवस, पाडवा यात्रा, दिवाळी पहाट, दहीहंडी हे सगळेच रस्त्यावर साजरे होत असते. त्याचे मग काय करायचे ? असा रोखठोक सवाल आनंद दवे यांनी उभा केला आहे.
मशिदीवरील स्पीकर खाली आले पाहिजेत हे ठिक आहे, मग हिंदूच्या उत्सवातील स्पिकरचे काय करणार असा प्रश्न आनंद दवेंनी उभा केला आहे.
एखाद्या मुस्लिम किंवा कट्टर पुरोगामी नेत्याच्या तोंडात शोभणारी भाषा आनंद दवेच्या तोंडी येणे हे खरोखरच अनपेक्षित आहे. खरेतर टिव्ही डिबेटशिवाय फार कुठेही आनंद दवेंचे फार वजन आहे असे दिसत नाही. पण त्यांचे हे म्हणणे मात्र खरेच वजनदार आहे आणि गांभिर्याने घेण्यासारखे आहे.