दौंड : महान्युज लाईव्ह
मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसा याच्या नावाखाली कोणी कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांची गय केली जाणार नाही. धार्मिक आणि सामाजिक सलोखा जपा असे आवाहन दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस आणि पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी केले.
येत्या काही दिवसांत येवून ठेपलेल्या रमजान ईद व शिवजयंती च्या पार्श्वभूमीवर दौंड पोलिसांनी नुकतीच सर्व पक्षीय शांतता बैठक आयोजित केली होती. यावेळी उपविभागीय अधिकारी राहुल धस आणि पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी सांगितले की, धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत राज्य सरकारने अद्याप कोणताही नवीन आदेश किंवा निर्देश दिलेले नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने सन २००५ ला भोंग्या बाबत जो निकाल दिला आहे त्याचीच अंमलबजावणी पोलीस करीत आहे. दौंडची शांतता आणि कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न कोणी करु नये. तसा प्रकार झाल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही मग तो कोणीही असो,अशा इशारा यावेळी देण्यात आला. मात्र दौंडचे नागरीक शांत आहेत, कायद्याचे पालन करतात, कोणत्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही असा विश्वास धस यांनी व्यक्त केला. यावेळी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्षा शितल कटारिया, रिपब्लिकन पक्षाचे नेते रविंद्र कांबळे, नागसेन झेंडे, भारत सरोदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष आप्पा पवार,भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष फिरोज खान, काँग्रेस पक्षाचे तन्मय पवार, विठ्ठल शिपलकर,शिवजयंती उत्सव समितीचे राजन खटी, युसुफ इनामदार तसेच बादशहा शेख, इंद्रजीत जगदाळे, शहानवाज पठाण,वसीम शेख, पुनम पडवळकर यांच्यासह विविध पक्षांचे व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.