राजेंद्र झेंडे,महान्यूज लाईव्ह
दौंड : मागील दोन वर्षापासून बंद असलेला दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे गाळप आता पुन्हा सुरू होणार आहे. तसे संकेत खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच दिले आहेत. उपमुख्यमंत्र्याच्या भविष्यवाणीमुळे दौंड तालुक्यातील राष्ट्रवादी कॅाग्रेससह भाजपच्या नेत्यांच्या भुवया उंचवल्या आहेत.
भाजप आमदार असलेल्या राहुल कुल यांना राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे भीमा पाटस सुरू करण्यासाठी सहकार्य करणार आहेत. मात्र ही आमदार राहुल कुल यांची राजकीय खेळी मानली जात आहे का? आणि तसे असेल तर भिमा पाटस कारखान्याकडे बोट करून कुल यांच्यावर सातत्याने निशाना साधणारे दौंड राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार रमेश थोरात यांची मात्र पुरती कोंडी होणार आहे.
पाटस येथील भिमा सहकारी साखर कारखान्यावर मागील पंधरा ते वीस वर्षापासून कारखान्याचे अध्यक्ष आणि आमदार राहुल कुल यांचे एकहाती वर्चवस्व आहे. राहुल कुल यांचा तालुक्यात राजकीय प्रवेश हा कारखान्याच्या माध्यमातून झाला. राष्ट्रवादीचे काॅग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या जवळीक कुल यांनी साधत तालुक्यात बघता बघता आपला वेगळा राजकीय ठसा उमटविला.
राष्ट्रवादीतच राहुल कुल आणि पुणे जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष रमेश थोरात असे दोन गट पडले. दौंड तालुक्यातील सत्ता काबिज करण्यासाठी कुल – थोरांत यांच्यात राजकीय संघर्ष सुरू झाला आणि तो आजतागायत सुरूच आहे. फरक एवढाच आहे की, सध्या कुल हे भाजपमध्ये आहेत आणि थोरात हे राष्ट्रवादीत.! मात्र कुल – थोरात यांच्यात राजकीय संघर्ष हा भिमा पाटस कारखान्यापासूनच सुरू झाला आणि आजही कारखान्या भोवतीच हे फिरत आहे.
भिमा पाटसचे संस्थापक कै. मधुकर (काका) शितोळे यांनी हा कारखाना सुरू केला. दौंडचे दिवगंत आमदार सुभाष आण्णा कुल आणि रमेश थोरात यांनी या कारखान्यावर निर्वाद सत्ता मिळवली. त्याकाळी भिमा पाटसचा एक सुवर्णकाळ अनेकांनी पाहिला आहे. त्यावेळी असलेल्या कारखान्याचे दिवस आठवले की, आजही सभासद आणि कामगारांना वाटते की त्यावेळीचे दिवस आजही पुन्हा पाहायला मिळावेत.
दिवगंत माजी आमदार सुभाष अण्णा यांच्या निधनानंतर त्याचे पुत्र राहुल यांच्याकडे कारखान्याची सत्ता आली ती आतापर्यंत त्यांच्याकडेच आहे. तालुक्याची राजकीय गणित ठरवणारा हा भिमा पाटस आज शेवटची घटका मोजत आहे. मागील दोन वर्षापासून या कारखान्याचे गाळप बंद असून आता तिसरे वर्ष तोंडावर आहे. हजारो कामगारांचे आणि सभासदाचे संसार चालविणारा हा कारखाना लवकर सुरू झाला पाहिजे अशी अनेकांची अपेक्षा आहे.
खरंतर कारखान्याचे गाळप बंदच व्हायला नको होते, मात्र कारखान्यावर असलेल्या कोट्यावधी रूपयांच्या कर्जामुळे हा कारखाना आर्थिक संकटात गेला आणि बंद पडला. भिमा पाटस आर्थिक संकटात जायला आणि बंद पडायला केवळ कारखान्याचे अध्यक्ष आणि आमदार राहुल कुल हेच जबाबदार असल्याची टिका माजी आमदार रमेश थोरात हे सातत्याने करीत आहेत.
ते जिल्हा सहकारी बॅकेचे अध्यक्ष असताना त्यांनी भिमा पाटसला कर्ज दिले, ते कर्ज थकीत आहे. या थकीत कर्ज वसूलीसाठी जिल्हा बॅकेने रमेश थोरात यांच्या कालवधीत जप्तीची नोटीस ही बजावली होती. रमेश थोरात यांनी कुल यांना भिमा पाटस कारखान्याच्या प्रश्नांवर सातत्याने धारेवर धरले आहे. भिमा पाटस कारखान्याच्या प्रश्नांवरच रमेश थोरात हे सन 2009 ला आमदार झाले.
मात्र त्यानंतर झालेल्या दोन्ही विधानसभा निवडणुकीत कुल यांच्यावर कारखान्याच्या प्रश्नांवर निशाणा साधला, मात्र त्यावर थोरात यांना यश आले नाही. कुल यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून 35 कोटी रुपये कारखाना सुरू करण्यासाठी आणले. कारखाना सुरू होईल अशी अपेक्षा होती मात्र कारखाना पुर्ण क्षमतेने सुरू झाला नाही. परिणामी 35 कोटी रुपये येवूनही कारखान्याचे गाळप बंद झाले आणि कारखाना बंद पडला.
पुन्हा एकदा हा कारखाना सुरू करण्याच्या हालचाली कुल यांनी सुरू केल्या मध्यंतरी कर्नाटक राज्यातील एक मंत्री भिमा पाटस कारखाना पाहून गेले अन काही महिन्यापुर्वी त्याची लिलाव प्रक्रीया ही होणार होती. पुन्हा कारखाना सुरू होणार असल्याने कामगार आणि सभासदांच्या आशा पाल्लवीत झाल्या होत्या. मात्र भिमा पाटस कुलांना चालवित येत नसेल तो चालवू नका, कारखान्यातील भष्ट्राचार झाकण्यासाठी हा कारखाना खासगी करण करून तो विकण्याचा हा डाव असल्याचा आरोप करीत कारखान्याचे माजी संचालक नामदेव ताकवणे आणि काही सभासद न्यायालयात गेले.
सध्या हा वाद न्यायालय प्रविष्ट आहे. कर्नाटकच्या मंत्र्याला हा कारखान्या चालविण्यास देण्यासाठी आणि लिलाव प्रकियेस माजी आमदार रमेश थोरात यांनीही तीव्र विरोध केला होता. पुणे जिल्हा बॅकेला न विचारता राज्य सहकारी बॅकेने लिलाव प्रक्रिया कशी केली असा प्रश्न थोरात यांनी उपस्थित केला होता. या लिलाव प्रक्रीयेस न्यायालयाने स्थगिती दिली असून सहकार साखर आयुक्तांनी कारखान्याच्या भष्ट्राचाराच्या चौकशीचे ही आदेश दिले आहेत.
मध्यंतरी पुणे जिल्हा सहकारी बॅकेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत रमेश थोरात हे जिल्हा बॅकेवर बिनविरोध निवडून गेले. या निवडणुकीत कुल
यांनी अर्ज दाखल करण्याचे टाळत निवडणुकीपासून लांब राहिले. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावेळी सभेत बोलताना दौंडचे नाव घेत सांगितले की, काही जागा बिनविरोध करण्यासाठी मी काहींना शब्द दिला आहे. तो शब्द मला पाळवे लागेल त्यामुळे स्थानिक नेत्यांनी त्यामध्ये लुडबुड करायची नाही.
कालपरवा उपमुख्यंत्री अजित पवार यांनी सोमेश्वर येथील सभेत भिमा पाटस कारखाना पुर्ण क्षमतेने चालु होणार असून मी त्यासाठी मदत करणार असल्याचे जाहीरपणे सांगितले. खद्द अजित पवार यांनीच हे जाहीर केल्याने दौंड तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते
रमेश थोरात यांना त्याच्या विरोधात भुमिका घेता येणार नसुन कारखान्याच्या बाबत टिकाटिप्पणी करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले असून त्यांची कोंडी झाली आहे.
यावर आता थोरात काय भुमिका घेतात हे पाहावे लागणार आहे. मात्र हे आमदार कुल यांचेच राजकीय डावपेच असल्याची चर्चा तालुक्यात आहे.
तालुक्यातील विविध विकास कामांच्या निमित्ताने आमदार कुल यांनी अजित पवार यांची जवळीक साधली आहे. जिल्हा बॅकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज न भरण्यासाठी आणि कारखान्यासाठी मदत करण्याचे आश्वासन कुल यांनी तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले नाही ना ?
भाजप आमदार असलेल्या कुल यांना दादा मदत कशी काय करतात हाच तालुक्यात चर्चेचा विषय ठरला असून अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. ? 2014 च्या निवडणुकीत कुल यांच्या दहा पिढ्यांबाबत बोलणारे अजित पवार यांच्या डोक्यात नेमके शिजतंय तरी काय ? खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आपल्या पत्नी कांचन कुल यांना भाजपची उमेदवारी देवून रिंगणात उतरविणारे कुल यांना दादा मदत करतात यावरच अनेकांचा विश्वास बसेना.
मात्र अजित पवार यांनी भिमा पाटस कारखाना सुरू करण्याच्या केलेल्या वक्ताव्यामुळे तालुक्यात राष्ट्रवादी कॅाग्रेसह भाजप मध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आमदार कुल हे घरवापसी तर करणार नाहीत ना ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत.? मात्र तालुक्यातील राजकीय डावपेच काही का असेना ? कोण कुठल्या पक्षात आहे आणि कोण कोणत्या पक्षाचा आमदार आहे ? कारखाना कोणी का चालवेना ? मात्र भिमा पाटस हा लवकर सुरू झाला पाहिजे अशी सर्वसामान्य सभासद आणि कामगारांची अपेक्षा आहे.
सध्या चालू करणे खूप गर्जचे आहे