दिल्ली : महान्यूज लाईव्ह
चीनच्या आर्थिक बोजाखाली अडचणीत आलेल्या श्रीलंकेमध्ये अन्नधान्यापासून इंधनापर्यंत ची टंचाई बेफाम झाली आहे. लोक रस्त्यावर उतरले असून श्रीलंकेमध्ये आणीबाणीची परिस्थिती आहे, मात्र शेजारी असलेल्या भारतातही श्रीलंके सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा इशारा चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींना केंद्रीय सचिवालयाच्या बैठकीत देण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या निवासस्थानी देशातील सचिवांची बैठक बोलावण्यात आली होती. यामध्ये 24 सचिव सहभागी झाले होते. या सचिवांनी बैठकीत अनेक राज्यांनी ज्या लोकानुनय करणाऱ्या योजना आणल्या आहेत, त्या योजनांचा परिणाम आर्थिक स्थितीवर होऊ शकतो असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला.
या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल व केंद्रीय मुख्य सचिव राजीव गौबा यांच्यासह केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दिल्लीत झालेल्या बैठकीत या सचिवांनी आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या राज्यांमध्ये देखील निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या लोकहिताच्या योजना चिंतेच्या परिस्थिती निर्माण करू शकतात असा इशारा दिला.
या योजना बंद कराव्यात, त्या देशाच्या हिताच्या नाहीत. अन्यथा या राज्याची अवस्था श्रीलंकेसारखी होऊ शकते अशा स्वरूपाची भीती या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.