सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : आज इंदापूर तालुक्यातील लाखेवाडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले व इतर नेत्यांच्या होणाऱ्या ऐतिहासिक पक्षप्रवेश सोहळ्यासाठी एक लाख चौरस फुटांचा भव्यदिव्य मंडप उभारण्यात आला आहे.वीस हजार नागरिकांना खुर्च्यांची बैठक व्यवस्था असणाऱ्या भव्य शामियाना व मंडपात एअरकंडीशनमध्ये हा सोहळा होत आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा होणारा हा कार्यक्रम आगामी होणा-या निवडणुकीचे रणशिंग फुंकणारा ठरणार आहे. शरद पवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भव्य शेतकरी मेळावा आणि पुणे जिल्हा परिषदेची माजी सदस्य श्रीमंत ढोले यांचा जाहीर पक्ष प्रवेश सोहळ्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे,खा.सुप्रिया सुळे,राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान शरद पवार यांच्या हस्ते जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी, विद्या निकेतन स्कूल अँन्ड ज्युनिअर कॉलेज प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल या “शैक्षणिक संकुल” चे उद्घाटन होणार आहे. यासाठी लाखेवाडीत कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सोहळ्यास २० हजार व्यक्तींकरिता आसन व्यवस्था करण्यात आली असून भव्य दिव्य असा शामियाना उभारण्यात आला आहे.
दोनशे प्रमुख पाहुणे बसतील असे स्टेज उभारण्यात आले आहे. उपस्थित नागरिकांना शामियान्यात तीनशे फॅन यासह एअरकुलरची सोय करण्यात आली आहे.त्यामुळे वातानुकूलित वातावरणात सोहळ्याचा आनंद घेता येईल असे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रत्येकाला पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे.तर भोजनाची व्यवस्था असणाऱ्या ठिकाणी ही वातानुकूलित यंत्रणा उभी करण्यात आली आहे.
त्यामुळे या शानदार प्रवेश सोहळ्यासाठी सर्व यंत्रणा उभी करण्यात आली आहे. शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार हे हेलिकॉप्टर ने या सोहळ्यासाठी दाखल होणार आहेत.यासाठी लाखेवाडी येथे हेलिपॅडची निर्मिती करण्यात आली आहे. इंदापूर तालुक्यातील २२ गावच्या बारमाही पाणी प्रश्नाबाबत तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी आश्वासन दिले होते.
मात्र, आज आश्वासनास २५ ते ३० वर्षांचा काळ ओलांडला असताना या दुष्काळग्रस्त पट्ट्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न कायम खितपत पडला आहे. त्यामुळे शेतकरी मेळाव्यात आणि माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांच्या पक्ष प्रवेश सोहळ्यात बावीस गावातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या पाणी प्रश्नावर देशाचे नेते शरद पवार काय बोलणार? याकडे या भागातील शेतकरी, नागरिकांचे लक्ष लागले आहे.