मुंबई : महान्यूज लाईव्ह
केरळमधील एका मंदिरात एका भरतनाट्यम नर्तकीला नृत्य सादर करण्यापासून रोखण्यात आले, कारण ती हिंदू नव्हती. ही बातमी आज सगळीकडे प्रसिद्ध झाली. या नृत्यांगनेने फेसबुकवर लावलेल्या कैफियतेतून ही बातमी लोकांपर्यंत पोचली. पण या तरुणीची सगळी जीवनकहाणी ज्यावेळी पाहिली त्यावेळी हिंदू आणि मुस्लिम कट्टरतेच्या या राजकारणात खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्षता दाखविणाऱ्यांना कसा त्रास सहन करावा लागत आहे, याची एक झलक तिच्या कहाणीतून आपल्यापुढे उभी राहते.
माझा कुठलाच धर्म नाही असे मानणारी ही तरुणी मुस्लिक कुटुंबात जन्माला आली. परंतू ज्यावेळेपासून तिला कळायला लागले तेव्हापासून तिने धर्मापासून फारकत घेतली. तिने भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली, त्यावेळी मुस्लिम कट्टरपंथियांनी तिला विरोध केला. पण घरच्यांच्या पाठिंब्याच्या आधारे तिने भरतनाट्यम शिकले. ती उत्तम नर्तिका झाली. तिने मनिशा व्ही पी हे नाव स्विकारले.
तिने एका हिंदू धर्मात जन्मलेल्या श्याम कल्याण नावाच्या संगितकार तरुणाला पती म्हणून स्विकारले. तिच्या लग्नाच्यावेळीही हिंदू आणि मुस्लिम दोन्ही कट्टरपंथियांनी खुप विरोध केला, पण दोन्ही बाजुच्या कुटुंबियांच्या आधारावर हे लग्न झाले आणि आजपर्यंत आनंदाने सुरु आहे.
हिंदू युवकाशी लग्न झाले म्हणून ती हिंदू झाली नाही. मुस्लिम आहे म्हणून तिने भरतनाट्यम शिकणे सोडले नाही. परंतू तिच्या या सगळ्या प्रवासात तिला सतत दोन्ही बाजूच्या कट्टर धर्मवाद्यांकडून अडचणींचा सामना करावा लागला आहे.
तिने तिच्या फेसबुकवर लिहले आहे, ` तिने भरतनाट्यममध्ये पीएचडी केलेली आहे, परंतू त्रिशूर जिल्ह्यातील कोडलमनीकय्यम मंदिरामध्ये तिची कलेची कदर केली गेली नाही, तर तिचा धर्म महत्वाचा ठरला. विशेष म्हणजे या मंदिरावर केरळ राज्य सरकारचे नियंत्रण आहे. यापुर्वीदेखील गुरुयावर येथील श्रीकृष्ण मंदिरात तिला हिंदू नसल्यामुळे कला सादर करण्यास मनाई करण्यात आली होती. ‘
‘ कला आणि कलाकार यांना नेहमीच धर्म आणि जातीच्या बंधनांनाचा त्रास सहन करावा लागतो. त्यांना कुठल्यातरी धर्माच्या बंधनांचा स्विकार केल्याशिवाय जगणे अशक्य करून सोडले जाते.’ असेही तिने म्हणले आहे.
अर्थातच तिच्यासाठी असे अनुभव नवीन नाहीत. त्यामुळे कोणत्याही रागाने किंवा त्राग्याने हा अनुभव मांडत नसून धर्मनिरपेक्ष केरळी समाज निर्माण करण्यामधील अडथळ्यांची जाणीव समाजाला करून देण्यासाठी हे लिहित असल्याचे तिने तिच्या फेसबुक पोष्टवर म्हणले आहे.
याच बातमीनूसार ज्यावेळी संबंधित देवस्थानच्या प्रमुखांना याबाबत विचारण्यात आले, त्यावेळी त्यांनी संबधित मंदिरामध्ये फक्त हिंदूच आपली कला प्रदर्शित करू शकतात, अशी या मंदिराची जुनी परंपरा आहे. ज्यावेळी मनिषाला तिच्या धर्माविषयी विचारण्यात आले त्यावेळी तिने आपण कुठलाही धर्म मानत नसल्याचे सांगितले. त्यामुळे तिला येथे भरतनाट्यम करण्यास मनाई करण्यात आल्याचे सांगितले.
आपल्या देशात धर्मनिरपेक्ष समाजस्थापनेसाठी गेले कित्येक वर्षे प्रयत्न होत आहेत. त्यातून खुप मोठी लोकसंख्या या धर्मनिरपेक्ष विचारांच्या मुशीत तयार झाली आहे. परंतू सध्या पुन्हा एकादा धर्मवादी तत्वांकडे जाण्याचा कल केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपासारख्या पक्षांचा आहे. त्यामुळे या स्थितीत धर्मनिरपेक्षता जपू पाहणाऱ्या लोकांची मोठी अडचण होताना दिसत आहे.
मनिषाच्या या उदाहणातून अशा लोकांना यापुढे अधिक अडचणींना तोंड देण्यासाठी सज्ज व्हावे लागणार आहे, हे मात्र नक्की.