सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
मुस्लिम समाजाविषयी गैरसमज निर्माण करून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे हिंदू-मुस्लीम ऐक्यामध्ये विष कालवण्याचे काम करीत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे इंदापूर शहराध्यक्ष शकीलभाई सय्यद यांनी केला असून भरणे यांच्या वक्तव्याचा सय्यद यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.
भाजप मुस्लीम विरोधी आहे तर ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करता त्यांनीच पहाटेच्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर शपथ का घेतली होती ? असा सवाल शहराध्यक्ष सय्यद यांनी भरणे यांना केला आहे.
काल राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एका सभेमध्ये भाजपा मुस्लिम विरोधी असल्याचे मत व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे इंदापूर शहराध्यक्ष शकील भाई सय्यद यांनी भरणे यांचा निषेध करत त्यांच्यावर टीका केली. भरणे यांच्यावर जातीपातीचे राजकारण करत असल्याचा आरोप करत मुस्लिम समाजामध्ये गैरसमज पसरवू नये, असेही सय्यद यांनी भरणे यांना सूचित केले आहे.
२०१४ मध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी न मागता भारतीय जनता पक्षाला जाहीर पाठिंबा दिला होता, तर ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहात त्यांनी पहाटेच्या वेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतली होती, असे सांगत सय्यद यांनी भरणे यांना त्यांच्या नेत्यांनी भाजपशी केलेल्या हातमिळवणी ची आठवण करून दिली.
शकीलभाई सय्यद म्हणाले,सबका साथ सबका विकास या तत्त्वाप्रमाणे भाजपा आपले कार्य करीत असून सर्व योजना सर्वांपर्यंत पोचविण्याचे कार्य भाजपाच्या वतीने होत आहे. म्हणूनच देशात भारतीय जनता पक्षाला निवडणुकीमध्ये यश मिळत असून भारतीयत्वाला पक्षातर्फे प्राधान्य दिले जाते.
गेल्या सात वर्षांमध्ये इंदापूर तालुक्यात कोण जातीपातीचे राजकारण करीत आहे ते सुज्ञ नागरिकांना माहित आहे. गेल्या सात वर्षात किती मुस्लिम तरुणांना तुम्ही रोजगार दिला, नोकरी दिली तेही त्यांनी सांगावे. मुस्लिम समाजाविषयी गैरसमज निर्माण करून हिंदू-मुस्लीम ऐक्य यामध्ये तुम्ही विष कालवण्याचे काम करीत असल्याचा आरोप करून तुमच्या मंत्र्याचे दाऊदशी संबंध जोडले गेले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या सर्व सहकारी संस्था, सहकारी साखर कारखाने तसेच पदाधिकारी निवडीमध्ये मुस्लिम समाजाला महत्त्वाचे स्थान आहे. तुम्ही अनेक कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचा उल्लेख करता हे कशाचे द्योतक आहे ? हे राज्यमंत्री भरणे यांनी स्पष्ट करावे, असा सवालही सय्यद यांनी केला आहे.