पुणे : महान्यूज लाईव्ह
ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना थंडावा देणारी एक बातमी आज आली आहे. ऐन मे महिन्याच्या उकाड्यात शेतात उभ्या पिकांना पाण्याचा ताण जाणवतो. बारामती, इंदापूर, फलटण, खंडाळा परिसरातील शेतकऱ्यांसाठी मे महिना परिक्षा पाहणारा असतो. परंतू आता त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
नीरा उजवा आणि डाव्या कालव्यातून सध्या सुरु असलेल्या आवर्तनाला जोडून अजून एक आवर्तन ३० जूनपर्यंत देण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक झाली.
नीरा प्रणालीअंतर्गत भाटघर, वीर, नीरा देवघर, गुंजवणी या सर्व धरणात मिळून ३५.५३ टीएमसी पाणी शिल्लक आहे. ते गेल्यावर्षीपेक्षा १.७५ टीएमसीने जास्त आहे. त्यामुळे हे जादाचे आवर्तन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आवर्तनामुळे ऐन उन्हाळ्यात शेतकरी तसेच या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नीरा उजवा आणि डावा कालवा, भीमा आसखेड, पवना व चासकमान प्रकल्पांची कालवा सल्लागार समितीची बैठक उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात पार पडली.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार गिरीश बापट, आमदार अशोक पवार, भीमराव तापकीर, चेतन तुपे, समाधान आवताडे, सुनील शेळके, राम सातपुते, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता एच. व्ही. गुणाले, पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे या बैठकीला उपस्थित होते.
जर ३० जूननंतरही पाऊस सुरु झाल्यास उशीर झाला तर पिण्यासाठी पाणी सोडण्याचे नियोजनही करण्यात आले असल्याची माहिती पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांनी दिली. चासकमान प्रकल्पातूनही सध्या सुरू असलेल्या आवर्तनासह दोन उन्हाळी आवर्तने सोडण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.