शिरूर : महान्युज लाइव्ह
विठ्ठलवाडी ( ता.शिरूर ) येथे दुपारच्या सुमारास शोर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तब्बल पस्तीस एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत सविस्तर असे की, भिमा नदीमुळे विठ्ठलवाडी परिसरात ऊसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले जाते. शुक्रवार दि. १८ रोजी दुपारी दोनच्या सुमारास अचानक उसाच्या शेताला आग लागली. यावेळी आग लागल्याचे कळताच स्थानिक शेतकऱ्यांनी आगीच्या ठिकाणी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला. मात्र उन्हाची तीव्रता व आगीची धग मोठ्या प्रमाणावर असल्याने आग आटोक्यात आणणे शक्य झाले नाही.
या आगीत शेतकरी अरुण शिंदे, गणेश शिंदे, किसन कुंजीर, संतोष गवारे, पुरुषोत्तम गायकवाड, बाळासाहेब गवारे, सत्यवान वारघडे, ज्ञानेश्वर गवारे, आत्माराम वारघडे, विशाल वारघडे, रामदास गवारे, काळूराम गवारे, दादासाहेब गवारे, सागर शिंदे, तेजस शिंदे, जगन्नाथ कुंजीर या १६ शेतकऱ्यांचा ऊस भस्मसात झाला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गावचे कामगार तलाठी सचिन काळेल यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून जळीत उसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याची माहिती तलाठी सचीन काळेल यांनी दिली. आगीत ऊस जाळून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.