राशीन : महान्यूज लाईव्ह
शेतीसाठी उपयुक्त असणारे सेंद्रिय खत तयार करून गायीचे संगोपन करण्याचे काम यशोदानंद गोशाळेच्या माध्यमातून केले जात आहे. सेंद्रिय शेती केली तर शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्न घेता येऊ शकते. यासाठी यशोदानंद गोशाळेच्या माध्यमातून एक प्रकारचे द्रावण तयार करण्यात आलेले असून त्याचा उपयोग गांडूळ निर्मितीसाठी, शेतात खत म्हणून केला जाऊ शकतो. त्यामुळे शेतीचा कस सुधारेल व शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल. हे द्रावण यशोदानंद गोशाळे मार्फत मोफत दिले जाते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांने किमान एका तरी देशी गायीचे संगोपन करण्याचे आवाहन यशोदानंद गोशाळेचे संचालक मिलींद राऊत यांनी केले.
कै. हरीभाऊ रामा राऊत यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या यशोदानंद गोशाळेचा पायाभरणी समारंभ नुकतेच राशीनच्या सरपंच निलमताई भिमराव साळवे, प्रसिद्ध व्यापारी समीर दोशी, हभप कालिदास महाराज काळे यांच्या हस्ते संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.
गोमाता आपल्याला आयुष्यभर दूधच देते, परंतु तिचा उपयोग संपला, की लोक तिला सोडून देतात. मात्र तिचे संगोपन करणे आपली जबाबदारी आहे. ती जाणून घेऊन यशोदानंद गोशाळा परिवाराने स्वीकारली आहे, त्यास शुभेच्छा व्यक्त करत गोशाळेस सर्वोतोपरी मदत करण्याचे सरपंच निलम साळवे यांनी सांगितले.
गोमातेचे संगोपन तर यशोदानंद गोशाळेत चांगल्या प्रकारे होतेच मात्र शेतीसाठी उपयुक्त खत बनवून इतर शेतकऱ्यांना गोमातेचे संगोपन करण्याची जागृती करणे देखील महत्त्वाची बाब असल्याचे सांगत राशीनचे प्रसिद्ध कापड व्यावसायिक समीर दोशी यांनी गोशाळेतील जिवदयेसाठी कडब्याची व्यवस्था केली.
यावेळी प्रसिद्ध व्यापारी प्रीतम शहा, हभप. मोती महाराज सोनवणे, माऊली सायकर, विठ्ठल सायकर, योगेश शर्मा, नवनाथ धनवे, अविनाश जांभळकर, अंकुश सायकर, सुनील राऊत आदी मान्यवरांच्या उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असणारे वासुदेव फर्निचरचे संचालक मेघराज बजाज यांनी यशोदानंद गोशाळेसाठी कडब्याची व्यवस्था केली.
गोमाता ही शेतकऱ्याला आयुष्यभर दूध देऊन त्यातून उत्पन्न मिळवून देते पण गोमाते पासून फायदा संपला की, बरेचसे शेतकरी गोमातेला कत्तलखाण्यात देतात किंवा गावामध्ये मोकळे सोडून देतात परंतु गोमातेला मोकळे किंवा कत्तलखान्यात न देता गोशाळेमध्ये आणून सोडावे, असे आव्हान गोशाळेचे संचालक बुवासाहेब राऊत यांनी केले.
सेंद्रिय शेतीशिवाय भविष्यात पर्याय नाही त्यामुळेच शेतीचा कस आणि मनुष्याचे आयुष्यमान सुधारेल त्यामुळे यशोदानंद गोशाळेमार्फत तयार करण्यात आलेल्या द्रावणाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा व आपले उत्पादन वाढवावे.असे आवाहन आयोजकांनी केले आहे.