दौंड : महान्यूज लाईव्ह
कृषी पंपाच्या थकीत वीज बिलावरुन शेतकरी आणि महावितरण कंपनीचा वाद अजुनही सुरु आहे, दौंड तालुक्यातील पुर्व भागातील मलठण येथे वीज तोडण्यासाठी आलेल्या दौंड महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी घेराव घालून वीज तोड करण्यास तीव्र विरोध केला. यावेळी शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी केली.
काल मंगळवारी उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी तीन महिने मुदतवाढ करीत वीज तोड न करण्याचे आदेश महावितरण कंपनीला दिले आहेत. मात्र मंगळवारी ( दि १५ ) दौंड महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता वैभव पाटील, ग्रामिण शाखा अभियंता जीवन ठोंबरे, वरिष्ठ शाखा अभियंता अमित धोत्रे तसेच लाईनमन हे दौंड च्या पुर्व भागातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या थकीत वीज बिले न भरल्याने रोहीत्रांवरील वीज जोड बंद करून वीज पुरवठा खंडीत करण्यासाठी आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी या अधिकाऱ्यांना घेराव घालत वीज तोड करण्यास तीव्र विरोध केला.
यावेळी शेतकऱ्यांनी मलठण येथील वीज सब स्टेशन बंद करुन धरणे आंदोलन केले.यावेळी महावितरण कंपनी आणि महाविकास आघाडी सरकारच्य विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दौंडच्या पुर्वभागातील मलठण, राजेगाव, काळेवाडी, वाटलुज आदी गावांमध्ये रोहीत्रांमध्ये सातत्याने बिघाड होत आहे. परिणामी शेती आणि घरगुती यासाठी आठ तास ही सुरळीत वीजपुरवठा होत नाही. दिवस दिवसभर वीज पुरवठा चालू होण्याची वाट पहावी लागते. रोहीत्रे जळाली तर आठ दहा दिवस रोहीत्रांची दुरुस्ती केली जात नाही. परिणामी नदीच्या काठावर असलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांना शेतपिकांना वीज नसल्याने पाणी देता येत नाही.शेतपिकांचे मोठं नुकसान होत असून शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो. अवघ्या आठ तासही महावितरण वीज पुरवठा करु शकत नाही .
मात्र महावितरण कंपनी कृषी पंपाची थकीत वीज बिले वसुली सक्तीने वसूली करीत आहेत. वीज तोड बंद करून वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. यास विरोध केला तर शेतकऱ्यांवर महावितरण कंपनी गुन्हे दाखल करीत आहेत, अशा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रवक्ते राजाभाऊ कदम, शेतकरी किरण वाघमोडे, प्रदिप देवकाते, नवनाथ थोरात, रामभाऊ शेळके,गोरख कोपनर, शशिकांत शेळके, विठ्ठल भोसले, लहु देवकाते यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.