सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील लाकडी येथील 54 वर्षीय महिलेची बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यातून तब्बल साडेचार लाखांची फसवणूक झाली आहे. या महिलेच्या म्हणण्यानुसार तिने कधीच एटीएम घेतले नव्हते, मात्र अवघ्या आठ दिवसात तब्बल साडेचार लाख रुपये एटीएमद्वारे काढले गेले आहेत. त्याहून आणखी महत्त्वाची बाब म्हणजे, एटीएमच्या कार्डवर जास्तीत जास्त 25 हजार रुपये दिवसाकाठी रक्कम निघण्याची मर्यादा असताना प्रत्यक्षात एका दिवसात 1.50 लाखापर्यंतची रक्कम काढली गेल्याचे सांगितले जात आहे.
यासंदर्भात वालचंदनगर पोलिस ठाण्याच्या अंकित असलेल्या भवानीनगर दूरक्षेत्रात अज्ञात आरोपींविरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, यामागे महिलेच्या एखाद्या नातेवाईकाचा अथवा बँकेतील एखाद्या कर्मचाऱ्याचा हात असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
यासंदर्भात लाकडी येथील लक्ष्मी बाळकृष्ण वणवे या 54 वर्षीय महिलेने भवानीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली. यामध्ये 7 जानेवारी 2022 ते 15 जानेवारी 2022 या आठ दिवसांच्या कालावधीत लक्ष्मी वणवे या महिलेच्या खात्यावरील पैसे लंपास करण्यात आले आहेत. या महिलेचे पती निवर्तले असून संपूर्ण आयुष्याची पुंजी त्यांनी महाराष्ट्र बँकेच्या खात्यात ठेवली होती.
ही रक्कम कळस येथील एका एटीएम मधून तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एटीएम मधून काढण्यात आली आहे. लक्ष्मी वणवे या काही दिवसांपूर्वी बँकेत गेल्या असता, त्यांना पासबुक प्रिंट केल्यानंतर सर्व रक्कम निघाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांना धक्काच बसला. आयुष्यातील सर्व पुंजी यामध्ये संपल्याने त्यांना मानसिक धक्का बसला.
या महिलेला लिहिता वाचता येत नसल्याने त्यांनी बँकेकडून कुठलाही व्यवहार केला नव्हता. तसेच त्यांनी सांगितल्यानुसार त्यांनी कोणत्याही प्रकारचे एटीएम घेतली नव्हते. मात्र त्यांच्या नावावरील एटीएम कार्ड वरून हे पैसे काढण्यात आले आहेत, ही रक्कम थोडीथोडकी नसून 4 लाख 50 हजार 372 रुपये एवढी असून, या गुन्ह्याचा पुढील तपास हवालदार गुलाबराव पाटील करत आहेत. या गुन्ह्यांमध्ये संबंधित महिलेचे नातेवाईक अथवा बँकेचे अधिकारी कर्मचारी यापैकी कोणाचा सहभाग आहे का? याचा शोध पोलिस घेत आहेत.