सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
वीजजोडणी मोहिमेच्या प्रश्नावर इंदापुरात भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली आहे. गेल्या आठवड्यात पुणे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करुनही हा प्रश्न सुटला नसल्याने आक्रमक होऊन भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.याबाबत हर्षवर्धन पाटील यांनी शेतकऱ्यांना आंदोलनास तयार राहण्यासाठी आवाहन केले असल्याचा व्हिडीओ व्हायरल केला आहे.
वीज तोडणीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर वीज पुरवठा तात्काळ सुरु करावा म्हणून नुकतेच इंदापूर येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली भाजपच्या वतीने पुणे-सोलापूर महामार्ग रोखून मोठे आंदोलन झाले होते. यावेळी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोन दिवसात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन हर्षवर्धन पाटील व मान्यवरांना दिले होते. मात्र याबाबत ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप करीत हर्षवर्धन पाटील यांनी पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
शेतकऱ्यांची चेष्टा करू नका, शांत बसलेल्या शेतकऱ्यांचा उद्रेक होऊ देऊ नका, असे सांगत तात्काळ वीजतोडणी थांबून जोडणी करावी, अशी विनंती करत हर्षवर्धन पाटील यांनी सरकारला वीज जोडणीसाठी दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. गेल्या आठवड्यात एवढे मोठे आंदोलन होऊनही सरकारने दखल घेतली नसल्याने हर्षवर्धन पाटील यांनी आंदोलन करण्याची तयारी केली आहे. सरकारला व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होत असून वीज जोडणीसाठी पाटील यांनी दोनच दिवसांचा अल्टीमेट दिला आहे.होणारे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नुकतेच इंदापूर येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने शेती पंपाचा वीज पुरवठा सुरू करण्यात यावा, या मागणीसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलन प्रसंगी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोबाईलद्वारे आंदोलकांशी संवाद साधत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता. या आंदोलनप्रसंगी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोन दिवसात सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन हर्षवर्धन पाटील व मान्यवरांना दिले होते. मात्र चार दिवस झाले तरी वीज पुरवठा पूर्ववत सुरु केला नसल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.
सध्या मुबलक पाणी आहे, पण वीज तोडणीमुळे शेतातील उभी पिके जळून चालल्याने, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे व त्रास देण्याचे काम सध्या महाविकास आघाडी सरकार करीत आहे. तालुक्याचे लोकप्रतिनिधी असलेले राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे शेतकऱ्यांचे वीज तोडणीबाबत अजूनही गप्प आहेत, अशी टीका हर्षवर्धन पाटील यांनी केली.
शेतकऱ्यांना महावितरणकडून आलेली बिले दुरुस्त करणे व दुरुस्तीचे बिल भरण्यासाठी शेतकऱ्यांना हप्ते पाडून देणे गरजेचे आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले. सध्या शेतकरीवर्ग आर्थिक अडचणीत असल्याने महाविकास आघाडी सरकारने शेतीपंपाचा वीज पुरवठा विना अट तात्काळ सुरु करावा, अन्यथा भाजपच्या वतीने पुन्हा तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असा स्पष्ट इशारा हर्षवर्धन पाटील यांनी दिला आहे.