वाई : महान्यूज लाईव्ह
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री नरसिंह हायस्कूल, धोम, ता.वाई विद्यालयांमध्ये एसएससी शुभचिंतन कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यावेळी दिशा अकॅडमीचे संस्थापक प्रा.डॉ. नितीन कदम म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये वेळेचे महत्त्व जाणले पाहिजे व कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे. जीवनात निश्चितपणे यशस्वी व्हाल, आत्मविश्वास अंगी ठेवा, आत्मविश्वास कधीही ढळू देऊ नका,यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वाई तालुक्याचे एलआयसीचे विकास अधिकारी अमरनाथ अनुसे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. गोष्टीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांनी प्रेरणा देण्याचे काम केले. गरीब होतकरू मुलांना शालेय गणवेश वाटून त्यांनी दातृत्व दाखवून दिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश मुसळे यांनी केले. विद्यार्थ्यांनी खचून न जाता नियमित अभ्यास केला, तर यश निश्चित प्राप्त होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख कृष्णा कांबळे यांनी केले. यावेळी विद्यार्थी मनोगतामध्ये विश्रांती मांढरे व स्नेहा भले यांनी विद्यालयाबद्दल बोलताना विद्यालयाने आमच्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार करून संस्काराची शिदोरी आम्हाला दिली.ती शिदोरी आम्ही घेऊन आम्ही आमचं जीवन सार्थक करू अशी कृतज्ञता यांनी व्यक्त केली. इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक वैभव देसाई यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. इयत्ता दहावीच्या बॅचकडून शाळेसाठी व्हाईट बोर्ड देण्यात आला.
कार्यक्रमाचे आभार विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्ता देसाई यांनी मानले. कार्यक्रमास उपस्थित धोम गावचे सरपंच अविनाश नायकवडी तसेच तंटामुक्तीचे अध्यक्ष गोरख शेरे तसेच अभेपुरीचे उपसरपंच स्वप्नील पाचपुते, ग्रा.पं सदस्य विजय मांढरे,सल्लागार समितीचे उपाध्यक्ष अशोक मराठे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत पोळ, शालेय समिती सदस्य दत्ता पवार, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी शिवाजी सुरवसे, संतोष पाटोळे, वैभव जाधव,सौ.पुनम पोळ, नाना चिंचकर, उत्तम झाजूर्णे आदी मान्यवर उपस्थित होते.