माणिक पवार
भोर : महान्यूज लाईव्ह
वडवणी तालुक्यातील देवडी येथील माजी सरपंच स्व. माणिकराव देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बीड जिल्ह्यातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता आणि प्रगतीशील शेतकरी अशी अनुक्रमे पत्रकारभूषण, समाजभूषण आणि कृषीभूषण पुरस्कार देऊन ” माणिकराव देशमुख सामाजिक विकास प्रतिष्ठानच्या ” वतीने दरवर्षी सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा ज्येष्ठ पत्रकार तथा प्रतिष्ठानचे अध्यक्ष एस.एम. देशमुख यांनी केली आहे.
देवडी गावचे भाग्यविधाते, माजी सरपंच माणिकराव देशमुख याचं नुकतंच निधन झालं.. माणिकराव देशमुख हे स्वतः प्रगतिशील शेतकरी होते.. शेतीत नवे प्रयोग करणाऱ्या तरूण शेतकऱ्यांना त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले होते. तसेच गावातील काही प्रगतीशील शेतकऱ्यांचा त्यांनी सत्कारही करत असे. स्वतः सामाजिक कार्यकर्ते असलेल्या माणिकराव देशमुख यांनी देवडी गावात विविध सामाजिक उपक्रम राबविले. वृत्तपत्राच्या माध्यमातून बंधारा बांधून गावातील पाणी टंचाई कायमस्वरूपी दूर केली, गरीब आणि गरजू मुलांना सायकलचे वाटप करून त्यांची पायपीट थांबविली. जिल्हा परिषदेत शाळेत इ-लर्निंगची व्यवस्था करून गावातील मुलांसाठी आधुनिक शिक्षणाचे दरवाजे खुले केले. स्वतःच्या शेतात तब्बल ४०० हून अधिक झाडे लावून वृक्षारोपणाचा संदेश दिला.
कृषी आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेले काम अजोड असलयाने त्यांच्या कार्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळत राहावी यासाठी कृषी, सामाजिक क्षेत्रातील आणि पत्रकारितेतील एका मानयवरास दरवर्षी २००१ रूपये रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देउन सन्मानित करण्यात येणार आहे. दरवर्षी २६ फेब्रुवारी रोजी देवडी येथील ” माणिक बागेत ” मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा होईल अशी माहितीही एस. एम. देशमुख यांनी दिले..