लक्ष्मण जगताप, बारामती
जगभरात ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. असे असले तरी स्त्रियांना आजही आपले हक्क आणि मागण्यांसाठी संघर्ष करावा लागतो.पूर्वीपासून आपल्या समाजात पुरुषप्रधान संस्कृती आहे.या संस्कृतीमध्ये स्त्रियांना पूर्वापार दुय्यम स्थान दिल्याचे आढळून येते.स्त्रियांना मन ,भावना आणि स्वतंत्र विचार असतात. याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते.स्त्रिया बुद्धिमान,कर्तृत्ववान ,धाडसी आणि पराक्रमी असतात. हे आपण सोईस्कररीत्या विसरुन जातो. स्त्री कधीच अबला नव्हती. तिला पुरुषी मानसिकतेने अबला ठरविले. धर्म ,रुढी ,परंपरा कर्मकांड यात अडकलेल्या समाजाने स्त्रियांना मोकळा श्वास घेऊ दिला नाही. पुरुषी वर्चस्व गाजविण्याच्या लालसेतून स्रियांच्या हक्क आणि अधिकारांची पायमल्ली केली. त्यातून तिचे कर्तृत्व नाकारण्याची परंपरा पुढे येत राहिली.
कोंबडं कितीही झाकलं म्हणून ते बांग द्यायचे थांबत नसतं .त्याप्रमाणे स्रियांना संधी नाकारली म्हणून त्यांचे कार्य आणि कर्तृत्व झाकले जात नाही.आज समाज शिकला असला सुसंस्कृत , सुशिक्षित झाला असला तरी स्रियांवरील अन्याय अत्याचार थांबलेले नाहीत.स्त्रिया म्हणजे चूल आणि मूल .हा समाजात रुजलेला चुकीचा विचार स्त्रियांनी बदलला आहे.
रुढी परंपरामुळे ज्या काळात स्त्रियांना घराच्या बाहेर पडता येत नव्हते. त्या काळात सावित्रीबाईंनी मुलींना शिकविण्याचे धाडस केले.सावित्रीबाईंमुळे महिलांना शिक्षणाची कवाडे खुली झाली. धाडसी आणि पराक्रमी असणाऱ्या जिजाऊसाहेबांनी कठीण प्रसंगी शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून स्वराज्याचा रथ हाकला. मेरी झांशी नही दूंगी अशी गर्जना करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई यांनी इंग्रजांशी निकराने लढा दिला.अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या राज्यात लोकोपयोगी कामे करुन लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले.महाराणी ताराराणी ,महाराणी येसूबाई ,माता रमाई अशा कर्तृत्ववान महिलांनी असामान्य कार्य करुन स्री शक्तीचा परिचय करुन दिला.
एवढेच काय अलीकडील काळातील इंदिरा गांधी यांनी देशाचे नेतृत्व खंबीरपणे करुन आपला वेगळा ठसा उमटविला.मदर तेरेसा यांनी मानवतेची सेवा याची शिकवण दिली. कल्पना चावला सारख्या जिद्द महिलेने अंतराळात सफार करण्याचे स्वप्न पाहिले आणि सत्यात उतरविले.अशी कितीतरी पराक्रमी स्त्रियांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले.मग त्यांना अबला कसे म्हणता येईल.
स्त्री जेवढी हळवी ,कोमल असते. तेवढीच कणखर ,स्वाभिमानी आणि लढाऊ बाण्याची असते.संकटकाळी वीजेसारखी उसळून त्यावर मात करण्याची शक्ती तिच्याच असते..पुरुषांप्रमाणेच स्त्री महत्त्वाची असते.त्यांना कमी न समजता सन्मानाची वागणूक दिली पाहिजे.त्यांचा आदर केला पाहिजे.
आजही सुशिक्षित म्हणवल्या जाणाऱ्या समाजाकडून स्रियांचा मानसिक शारीरिक छळ केला जातो.लग्नात हुंडा दिला नाही ,मुलगीच जन्माला घातली अशा अनेक कारणावरुन स्रियांचा छळ केला जातो.या जाचाला कंटाळून अनेक स्त्रिया आत्महत्येचा मार्ग निवडतात. अशा वेळी वाटते स्रियांना खरंच स्वातंत्र्य आहे का?
गावच्या सरपंच पदापासून ते देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत मजल मारुन महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.रेल्वे ते आकाशात विमान चालविण्यापर्यंत महिलांनी झेप घेतली आहे.पोलिस ,एस.टी वाहक,आता तर लष्करातसुद्धा देशसेवा करण्याची संधी महिलांना प्राप्त झाली आहे.मेधा पाटकर यांच्यासारख्या अनेक महिला समाजासेवेसाठी आपले योगदान देत आहेत. पी.टी.उषा ,साईना नेहवाल ,मिताली राज ,मेरी कोम यांनी खेळात कौशल्य सिद्ध करुन आपल्या शक्तीची जाणीव करुन दिली आहे.आजही अनेक तरुण महिला राजकारण ,शिक्षण ,शेती ,सहकार यात उत्तम काम करीत आहेत.फक्त नावापुरते विविध खुर्चीत स्रियांना बसवून चालणार नाही तर त्यांना प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घेतले तरच ख-या अर्थाने त्यांना समान संधी दिल्यासारखे होईल.काही ठिकाणी आपण पाहतो स्रिया फक्त सहीच्या मालक असतात.तर निर्णय घ्यायला पुरुष असतात.याला स्वतंत्र बाण्याच्या आणि अभ्यासू स्त्रिया अपवाद असू शकतात. आपल्या कार्यशैलीने स्वतंत्र ओळख निर्माण करतात.
कुटुंबाचा पाया म्हणजे स्त्री. कुटुंबाचा आधार म्हणजे स्त्री घराचे घरपण म्हणजे स्त्री .
कुटुंबाचा ,समाजाचा आणि राष्ट्राचा उद्धार करण्याची क्षमता आणि ताकद स्रीमध्ये असते.फक्त महिला दिनापुरताच स्री शक्तीचा गवगवा नको. तर या जगात स्त्रियांना सुद्धा आनंदी आणि भयमुक्त वातावरणात जगण्याचा हक्क आहे याची जाणीव समाजाला पदोपदी व्हायला हवी.